श्री. विजय मुकुंद तथा दादासाहेब आठवले


‘शोगिनी’ यशाचे शिल्पकार
जन्म 01/01/1946
वंशावळ संदर्भ : जांभुळपाडा

एका कर्तृत्ववान आणि असामान्य व्यक्तिमत्त्वाची आपण ओळख करून घेणार आहोत. पुणे-सातारा एक्स्प्रेस हायवेला लागूनच खेड-शिवापूर जवळील डोंगरांच्या छायेत ‘शोगिनी’चा एक विस्तारित भव्य प्रकल्प येणार्‍या-जाणार्‍या प्रवाशांचे, वाटसरूंचे लक्ष वेधून घेताना दिसतो. ‘शोगिनी टेक्नोआर्टस्’ ने केलेल्या उत्कर्षाचा, उन्नतीचा तो चालता - बोलता पुरावा आहे. या विशाल औद्योगिक प्रकल्पाचे शिल्पकार आहेत श्री. विजयराव आठवले. एक उमदे आणि कार्यमग्न व्यक्तिमत्त्व ! कोणतेही यश अथवा विजय आपण होऊन तुमच्या दाराशी येत नाही तर त्यासाठी पायांखाली कष्टांचे निखारे, हातात प्रयत्नांची मशाल आणि मनात उदात्त विचारांचे, वास्तव कल्पनांचे वारे वाहावे लागतात. ‘शोगिनी’ची विजयगाथा या प्रत्येक शब्दाच्या आशयाचे मूर्तिमंत स्वरूप आहे असे म्हणणेच योग्य ठरणार आहे.

पुण्यातील एका मध्यमवर्ग कुटुंबात श्री. विजयराव यांचा जन्म झाला. मध्यमवर्ग म्हटला म्हणजे बेताचेच किंवा क्वचितप्रसंगी ओढग्रस्त असे अर्थोत्पादन ! त्यामुळे साहजिकच चैन, शौक, मौजमजा याची नेहमीच वानवा आढळते. अशा कुटुंबातील मुलाने उद्योगपती बनण्याचे स्वप्न बघणे म्हणजे औदुंबराला फूल गवसण्यासारखे होय. अशा वातावरणात जन्मलेल्या विजयरावांनी नू. म. वि. मधून एकमार्गी अकरावीची परीक्षा उत्तीर्ण केली. लहानपणापासून वडिलांची शिस्त, काटेकोरपणा आणि व्यवहारिक रोखठोकपणा याचे संस्कार नकळतपणे विजयरावांवरही झाले. आपल्याला या आर्थिक परिस्थितीतून सही सलामत बाहेर पडायचे असेल आणि भव्य-दिव्य कल्पनांचे सुंदर, अपेक्षित रोपटे लावायचे असेल तर काही तरी व्यावसायिक शिक्षण घेतले पाहिजे असे त्यांनी मनाशी ठरविले. या शिक्षणामुळे अनुभवाचे व आर्थिक भांडवल उभे करता येईल अशी दोन्ही उद्दिष्टे साध्य व्हावीत असेच त्यांच्या मनाने निश्‍चित केले. अन् म्हणूनच अकरावी झाल्याबरोबर केवळ पदवी शिक्षणाचा आग्रह न धरता वाडिया कॉलेजमधून दोन वर्षांचा मेकॅनिकल ड्राफ्टस्मनचा अभ्यासक्रम निवडून तो यशस्वीपणे पूर्ण केला.

पुण्याची वाडासंस्कृती पूर्णपणे उध्वस्त झाली नव्हती, कुठेतरी एकाद - दुसर्‍या वाड्यातून त्याचे जुनेपण घालवून फ्लॅट संस्कृतीचा उदय होत असताना विजयराव सदाशिव पेठेतील जोशी वाड्यात निवास करीत होते. त्या वाड्याच्या दर्शनी जागी त्यांचे वडील व काका टेलरिंगचा व्यवसाय करीत. कापडाची काटछाट करीत इतरांचे मापानुसार कपडे शिवण्याचा व्यवसाय करणार्‍या पित्याच्या पोटी शेकडो कुटुंबाचे उदरभरण व भवितव्य घडविणार्‍या अपत्याने जन्म घेतला आहे, अन् ते विजयराव आहेत असे जर कुणी सांगितले असते तर त्याची येरवड्यालाच रवानगी झाली असती. पण पुन्हा इथे नियतीने आपली मूठ उघडली...
एक दिवस अचानकपणे वाड्याचे मालक आणि आठवले यांचे चित्रकलेचे शिक्षक श्री. जोशी यांनी, ‘पी. सी. बी. बनविणार्‍या कंपनीत पीसीबीचे ड्राँईंग करण्याचे अर्धवेळ काम करणार का ?’ असे विजयरावांना विचारले. क्षणभरच त्यांनी विचार केला आणि संध्याकाळी तरी नुसते का बसायचे, दिवसभर धडपडायचे हीच आपली ‘भाग्यरेषा’ असे समजून ‘होकार’ दिला. पीसीबी क्षेत्रातील आजच्या यशोगाथेचा येथूनच खर्‍या अर्थाने श्रीगणेशा सरू झाला. ‘एका कोळियाने एकदा आपुले। जाळे बांधियेले उंच जागी।’ या कवितेचे स्मरण व्हावे असाच हा प्रसंग होता.

‘आपण कोणीतरी व्हायचे’ हे स्वप्न व जिद्द असल्यामुळे कामातील रसिकता, तत्परता, नेटकेपणा, कालमर्यादा इत्यादी आवश्यक बाबींनी पीसीबीचे कार्य रात्रंदिवस चालू ठेवले. जागा अपुरी पडू लागल्यामुळे नव्या पेठेत भाड्याने जागा घेतली व कार्य विस्ताराच्या दिशेने पावले पडू लागली. तरीही दिवसा नोकरी करून उर्वरित वेळात आपला व्यवसाय करीत असता वडील नानासाहेब आणि पत्नी शोभा यांनी सर्वार्थाने योगदान देऊन व्यवसायाचा वेलू फुलविण्यास मदत केली. अथक परिश्रम व जागरण करून ग्राहकांचे समाधान व संतोष देण्याची परंपरा राखली. एकदा दिशा ठरविल्यानंतर त्यात सिद्धी व गुणवत्ता, तंत्रज्ञान मिळविण्याच्या उद्देशाने विजयरावांनी जे. एन्. मार्शलला ‘अलविदा’ करून 1978-79 साली पुण्यातील पीसीबी तयार करणार्‍या ‘इलेक्ट्रोटेक सर्किटस्’ कंपनीत ‘डिझायनिंग’, ‘ड्रॉईंग’ आणि ‘प्रॉडक्शन’ विभागाचे व्यवस्थापक म्हणून जबाबदारी स्वीकारली.
येथेच विजयरावांचे खरा उद्योगपती बनण्याचे ध्येय दिसून येते. वस्तुत: त्यांना खासगीरित्या मिळणार्‍या ऑर्डर्सवरच लक्ष केंद्रित करून आपला व्यवसाय भराभर वाढविता आला असता. परंतु तसे न करता आपल्या व्यवसायातील विविध क्षेत्रातील बारकावे केवळ अनुभवातूनच नव्हे तर त्यात नैपुण्य संपादून टप्प्याटप्प्याने व्यवसाय वाढविला तर तो अधिक यशस्वी व चिरकाल टिकू शकतो या मंत्राची त्यांना जाण होती. म्हणूनच व्यवसायासाठी कोणतीही गोष्ट शिकताना अनुभवाबरोबरच व्यावसायिक पक्वतेची अनुभूती दिली.

विजयरावांचा पीसीबी क्षेत्रातील अधिकार, अनुभव आणि आत्मीयता पाहून त्यांच्या मित्रांनादेखील त्यांच्यातील उद्योगपतीचे गुण दिसले अन् त्या सर्व मित्रांनी, ‘तुम्हीच स्वतंत्र व्यवसाय सुरू करा. आम्ही तुम्हाला भरपूर काम देऊ’ असे केवळ आश्वासन देऊन थांबले नाही तर तशी कृतीदेखील केली. ‘आलेल्या संधीचे सोने केले तर यशोदायिनी तुम्हाला विजयाची माला अर्पण करते’ या तत्त्वावर विश्वास ठेवून विजयरावांनी आपल्या नव्या पेठेतील जागेतच पत्नी व दोन कन्या (शोभा + गिता + नीता) यांच्या आद्याक्षरांनी युक्त असा ‘शोगिनी’ टेक्नोआर्टस् नामक व्यवसाय सुरू केला.

मित्रांच्या शब्दांना कृतीचा किनारा लाभला. त्याच्यामागे महत्त्वाचे कारण होते विजयरावांचे नैपुण्य, प्रामाणिकपणा आणि तत्परता ! त्यामुळे आपोआपच व्यवसायात वृद्धी होऊ लागली. नव्या पेठेतील जागा अपुरी पडू लागली म्हणून पेशवाई हॉटेलमागील भावाच्या जागेत व्यवसाय सुरू केला. विजयरावांचे चुलतभाऊ श्री. सतीश आठवले यांचेही त्यांना सहकार्य लाभून वाढत्या व्यवसायामुळे मागणी आणि पुरवठा यांचा मेळ घालणे अल्प काळातच शक्य होऊ लागले. नारायण पेठेतील सिताफळबाग कॉलनीत बापट बंगल्यामध्ये पीसीबीचे उत्पादन सुरू केले तरीही ‘वाढता वाढता वाढे’ असे होऊ लागले. त्रि-स्थळी यात्रा यामुळे शक्ती अकारण व्यय होऊ लागल्याने जमलेल्या पैशांतून खेड-शिवापूर येथे 2 एकर जागा खरेदी केली. हाच खरा सोनियाचा क्षण ! त्या ओसाड अन् ओबडधोबड जागेची स्थानिक कामगारांकडून साफसफाई करून तेथे एक हजार चौरस फुटांची शेड बांधून 5-6 कामगार व महिला यांच्या मदतीने पीसीबी व्यवसायाचा शुभारंभ केला.

श्री विजयरावांना घरच्यांनी प्रचंड साथ दिली त्याचप्रमाणे कोणतेही काम करताना ते अधिक सुंदर, चांगले करण्याचा प्रयत्न केला. कारखाना नावारूपाला आला. दरवर्षी नवनवीन यश व प्रगतीचे टप्पे पार करीत ‘शोगिनी टेक्नोआर्टस्’ने पीसीबी क्षेत्रात एक नवीन परिमाण, नवा मानदंड प्रस्थापित केला. आज 750 कामगार तीन पाळ्यांमध्ये काम करीत असून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत जागतिक बाजारपेठेत दर्जेदार व गुणवत्तायुक्त उत्पादन करणारी, कालमर्यादेत पुरवठा करणारी कंपनी म्हणून नावलौकिक संपादन केला आहे. हे सर्व पंधरा एकर जमिनीवर वाढलेल्या व्यापातून चालविले.

एकोणीस वर्षापूर्वी जो परिसर दगड-धोंडे, कपारी, रानटी वनश्रींनी ओबडधोबड असा दुर्लक्षित होता त्या परिसरात विजयराव आणि त्यांच्या कुटुंबियांचा परिस स्पर्श होऊन तेथे खरोखरीच आज नंदनवन फुलले आहे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही.
मराठी शुद्ध रत्नाकरात ‘उद्योग’ यासाठी प्रयत्न, काम, धंदा आणि ‘उद्योगी’ यासाठी नेहमी कामात गुंतणारी, मेहनती यासारखे अर्थ अभिप्रेत असले तरी आजच्या नव्या औद्योगिक परिभाषेला हा संदर्भ किती चपखल लागू पडतो पहा,
‘‘.....कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन।
मा कर्मफल हेतुर्भु: मा ते संगोऽस्त्व कर्मणि॥’’
हा भगवद्गीतेतील श्लोक अत्यंत मार्गदर्शक ठरतो. आपले यथोचित कर्म मन लावून प्रामाणिकपणे करावे. चित्त स्थिर राखण्याचा अभ्यास करणे हीच ज्ञानमार्गाची पहिली पायरी आहे. काहीही कर्म न करता निष्क्रीय राहू नये. यथाशक्ती, यथामती काहीतरी उद्योग करीत रहावा. कोणताच उद्योग केला नाही तर कसलीच प्रगती होणे अशक्य! विजयरावांनी आपल्या कृतीने ‘उद्योगा’चे महत्त्व पटवून दिले आहे. तसेच जो उद्योग आपण करीत आहोत तो आपल्या बुद्धीप्रमाणे सर्वांगसुंदर करण्याचा आपला प्रयत्न आहे, तोपर्यंत तो ईश्वराच्या ठिकाणी रूजू होणारच ! हे सूत्र विजयरावांनी तंतोतंत आत्मसात केले आहे.
कोणत्याही व्यवसायाच्या यशाची गुरुकिल्ली ही मालक आणि कामगार यांच्यातील संबंध, सहकार्य आणि सद्भावावर अवलंबून असते. श्री. विजयराव यांना आपल्या कारखान्यातील प्रत्येक व्यक्तीचे नाव, त्याचा स्वभाव आणि कौटुंबिक परिस्थिती याविषयी संपूर्ण माहिती असून त्यांच्या नाना, मामा, गंपा वगैरे टोपण नावानेच संबोधतात. दुखलं - भागलं विचारपूस करतात, त्यामुळेच शोगिनी हे एक कुटुंब बनले आहे. अन् त्या कुटुंबाचे प्रमुख ‘दादा’ असल्यामुळे व्यवसायाची यशोशिखराकडे वाटचाल चालू आहे. आपल्या व्यवसायाला लागणारे साहित्य निर्मिती आपल्याच कुटुंबातील सहकार्‍यांकडून व्हावी व त्यांचा उत्कर्ष व्हावा यासाठी विजयरावांनी काही कामगारांना मुद्दाम स्वतंत्र व्यवसाय उभे करून दिले.
सामाजिक कार्य

श्री. विजयराव आठवले सामाजिक बांधीलकीच्या भावनेन सातत्याने तन-मन-धनाने सामाजिक कार्य व इतरांच्या कार्याला मदत करीत असतात. त्यांच्या कार्याची खालील काही ठळक उदाहरणांवरुन वाचकांना कल्पना येईलच. 
  1.	कामगारांना आपले घर बांधण्यासाठी सर्व परीने मदत करणे.
  2.	जवळपासच्या खेडेगावातील शाळेचे वर्ग, वस्त्या, पाण्याची सोय, गणेश मंडळ, हरिनाम सप्ताह, उरुस व स्नेहभोजन यासाठी शक्य तेवढे सहकार्य व मदत करणे.
  3.	शिवरे येथील जीवन शिक्षण विद्या मंदिर शाळेस इमारतीची दुरुस्ती, वर्ग बांधणे, फरशी बसवणे याद्वारे मदत केली.
  4.	शिवभूमी विद्यालय, खेड येथील शाळेतील हुशार मुलांना बक्षीसे, पुस्तके व वह्या वाटणे.
  5.	रावडी ता. भोर येथील शाळेस मदत व वेल्हा तालुक्यातील वेल्हा वनवासी व विद्यार्थी वसतीगृहास आर्थिक व इतर मदत केली व देणगी दिली.
  6.	गाऊडदरा, कोंढणपूर व इतर गावातील शाळांना व जिल्हा परिषद शाळांना वह्या, पुस्तके, गणवेष, खुर्च्या, बाके, खाऊ व इतर आर्थिक मदत.
  7.	अभिनव ज्ञान मंदिर कडाव, कर्जत ता. जि. रायगड यांना वर्ग बांधून दिले.
  8.	शिवाजी मराठा प्रायमरी स्कूल, पुणे, समर्थ शिक्षण संस्था धनकवडी व अनेक शाळांना आर्थिक मदत व वह्या पुस्तके वाटप.
  9.	माळेगाव, नसरापूर येथील ज्ञानप्रकाश आदर्श विद्यालय यास जागा घेण्यास व शाळेच्या इमारतीचे बांधकाम करण्यास मनुष्यबळ, बांधकाम, लोहकाम व इतर सर्व साहित्य पुरविण्याची व्यवस्था जवळ जवळ 7-8 लाखामध्ये आर्थिक मदत करीत आहेत. संपूर्ण शाळेचे नूतनीकरण व पूर्ण शाळा चालविण्यास घेण्याचा विचार असून त्यास ‘आठवले माध्यमिक विद्यालय’ असे नामकरण कार्यक्रम दि. 15/8/2002 रोजी जाहीर कार्यक्रमाद्वारे करण्यात आले आहे. पावणे दोन एकर जागा व 8 वर्ग बांधून दिले.
10.	नसरापूर येथील बनेश्वर मंदिरासमोर पेशवेकालीन वाड्याजवळ श्री बुवासाहेब महाराजांची जुनी, जीर्ण अवस्थेतील समाधी आहे. त्याठिकाणी चांगल्या प्रकारे आर. सी. सी. बांधकामात मंदिर बांधले आहे.
11.	वेगवेगळ्या शाळेत व्यक्तिमत्त्व विकास शिबिरास व वसतीगृहास जमेल तेवढी मदत त्यातही जेवणाची व इतर आर्थिक मदत केली. शिवाय बर्‍याच वेळा सामाजिक, सार्वजनिक संस्था व आश्रमास, मंदिरास मदत केली आहे.

इतर सामाजिक कार्ये -
  1.	क्रीडा भारती यांना आर्थिक मदत केली.
  2.	भोर तालुका वेल्हा आणि भोर येथील वनवासी विद्यार्थी वसतीगृहास जागा घेण्यासाठी मदत, गणवेष, अन्नधान्य, पुस्तके, वह्या व इतर प्रकारची मदत केली.
  3.	पुरंदर तालुक्यातील सिंधुताई सपकाळ यांच्या ममता सदन आश्रमाला अनेक प्रकारे वारंवार मदत केली जाते. त्यात वैद्यकीय तपासणी शिबिर, मुलांसाठी दिवाळी खाऊ, वह्या, पुस्तके व इतर मदत चालू आहे.
  4.	अनेक गावातील उरुस, हरिनाम सप्ताह, गणेशोत्सव, शिवजयंती, देवी देवतांची मंदिरे बांधण्यास मदत, रस्त्याचे काम, पाण्याची योजना यासाठी मदत केली जाते.
  5.	पूर्वी लातूर जिल्ह्यात झालेल्या भूकंपग्रस्त लोकांसाठी कपडे, अन्नधान्य व आर्थिक मदत केली.
  6.	संगम ब्रिजजवळील गुप्त शाखा विभागाच्या आवारापाशी क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचा पुतळा उभारण्यासाठी
रु. 1,50,000/- अर्थ सहाय्य केले.
  7.	कारगिल युद्धात अमर झालेल्या जवानांसाठी 
रु. 75,000/- ची आर्थिक मदत केली.
  8.	गुजरात व सुनामीग्रस्तांना रु. 75,000/- ची आर्थिक मदत तसेच सकाळ व केसरी या वृत्तपत्रांनी जमविलेल्या निधीला अनुक्रम रु. 2,00,000/- आणि रु. 1,50,000/- अर्थसहाय्य केले.
10.	वेगवेगळ्या संकटांच्या वेळी कारखान्यात रक्तदान शिबिर व तसेच कामगारांसाठी नेत्र तपासणी व मोफत चष्मे वाटप करण्यात आले.
11.	यशस्वी उद्योजक म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या हस्ते इ. स. 1997 साली पुरस्कार मिळाला. मराठी तरुणांना अनेक परीने मदत व रोजगाराची संधी उपलब्ध करून दिल्यामुळे त्यांचा ‘जागतिक मराठी चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीज’ तर्फे द्वितीय पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. सदर पुरस्कार, श्री. विलासराव देशमुख यांच्या हस्ते देण्यात आला.
12.	वारजे येथील श्री. घैसास गुरुजींच्या ‘वेदभवनास’ कायमस्वरुपी वार्षिक तांदूळाची मदत.
13.	पुण्यातील अनेक गणेश उत्सवांना मदत, त्यातही नवी पेठेतील हत्ती गणपती मंडळास अनेक प्रकारची आर्थिक मदत केली.

श्री. विजयराव तथा दादासाहेब आठवले यांच्या कर्तृत्वान मराठी उद्योजकास मानाचा मुजरा आणि उत्तरोत्तर प्रगतीसाठी शुभेच्छा!