आठवले कुल ज्या कुलगुरुमुळे अत्रिगोत्रीय म्हटले जाते त्या अत्रिऋषींसंबंधी माहिती अशी:
प्रजापती व वाक्देवी यांचा अत्रि हा पुत्र. आई-वडीलां प्रमाणेच तेजस्वी, प्रभावी, ज्ञानी असा हा बालक मोठा होऊन एक अग्रगण्य ऋषी बनला. सप्तर्षीं पैकी एक महत्त्वाचे ऋषी म्हणून त्यांची महती आहे. त्यांच्या काळातील एवढा सूज्ञ, द्रष्टा, बुद्धीमत्तेला प्राधान्य देणारा ऋषी क्वचितच आढळेल असे मानतात.
अत्रि म्हणजे, अ = नाही, त्रि = सत्त्व, रज, तम हे त्रिगुण. ज्याचे ठिकाणी हे त्रिगुण नाहीत, जे त्रिगुणातीत आहेत ते अत्रि. अत्रि ऋषींनी फार प्रचंड कार्य करून आपल्या मातेची ईच्छा पूर्ण केली. सर्व-सामन्यातील पशुवृत्ती, भोगवृत्ती कमी करून अत्रि ऋषींनी ज्ञान उक्रांत केले. त्यांनी गूढ भाषेतील ज्ञान सोप्या, सरळ व मधुर भाषेत समजावून सांगून लोकांना मानव म्हणून जगण्यास शिकविले. अत्रि ऋषींनी अत्रिसूत्र, अत्रिसंहिता व अत्रिस्मृती असे ग्रंथ रचले व पर्जन्यसूक्त गायले. त्यांनी तेजस्वी लोकांची, तत्त्ववेत्त्यांची, कवीजनांची एकत्र अशी निडर, नि:स्वार्थी व समर्थ संस्था निर्माण केली. अत्रि ऋषींकडे सर्व थरातील लोक जात. अज्ञानी, पापी सर्वानाच ते संस्कारी करीत. भक्तियोग, कर्मयोग व ज्ञानयोग अंगिकारित. प्रत्येक पातकाला प्रायश्चित्त आहे ही विचारधारा असणारे अत्रि हे पहिले ऋषि होत. त्यांचा पट्टशिष्य आर्य नानस यांनी अत्रीच्या विचारांना प्रसिद्धी दिली.
अत्रीच्या गुणामुळेच ‘अत्रि = जगमैत्री’ हे समीकरण रूढ झाले असावे. अत्रिऋषी विनंति अथवा प्रार्थना करीत नसत. ते प्रत्येक विचार कृतीत उतरवित. अत्रि ऋषींनी खऱ्या अर्थाने ‘लोकसत्ता’ प्रत्यक्ष्यात आणली व सदैव लोकसत्तेचा आग्रह धरला. जगांत लोकशाहीचा आवाज उठविणारे व अपात्र राजाला राजा न मानण्याचे धाडस दाखवणारे अत्रि ऋषी हे पहिले ऋषि. सूर्यग्रहणाचे खरे स्वरूप उघड करून सांगणारे अत्रि हे संशोधक ऋषि होत. हाक मारताच ज्यांच्यापुढे श्री विष्णू उभे ठाकत अशा अत्रीचा, कर्दम ऋषींची द्वितीय कन्या अनुसूया हिजबरोबर विवाह झाला होता. त्यांना कर्तृत्त्ववान दत्तात्रय, तपोनिष्ठ दुर्वास, प्रजापतीरूप सोम व देवस्वरूप आर्यवान असे चार पुत्र व अमला ही कन्या अशी मुले झाली. अशा ह्या अत्रिऋषींच्या अत्रिकुलातील आपण सर्व आठवले म्हणून अत्रिगोत्रीय असा आपला निर्देश होत आहे. चित्त्पावनांची जी चौदा गोत्रे आहेत, त्यांच्या कुलगुरूंना अत्रिऋषींनी एकत्र आणून सर्व विद्वानांना एकत्रितपणे विचारविनिमय करण्यास प्रवृत्त केले असले पाहिजे
- जोगळेकर कुलवृत्तांत -1999 च्या सौजन्माने
एका संशोधनानुसार ‘अष्टवेले - आठवेले - आठवले ’असा आपल्या आठवले या आडनावाचा अपभ्रंश होत प्रवास झालेला आहे.