आपला इतिहास


मरावे परी कीर्तिरूपे उरावे

ही समर्थांची उक्ती त्यांनी सार्थ केलेली असते आणि मृत्यूनंतरही ते कीर्तिरूपात पुढील पिढ्यांच्या स्मृतीत राहून त्यांना प्रेरणा देत राहतात

सर्वसाधारणपणे प्रत्येक कुळात अभिमान बाळगावा असे कर्तृत्ववान स्त्री-पुरूष कमी-अधिक संख्येत पूर्वी होऊन गेलेले असतात आणि त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा, पराक्रमाचा ठसा कालपटावर उमटवलेला असतो. ‘मरावे परी कीर्तिरूपे उरावे’ ही समर्थांची उक्ती त्यांनी सार्थ केलेली असते आणि मृत्यूनंतरही ते कीर्तिरूपात पुढील पिढ्यांच्या स्मृतीत राहून त्यांना प्रेरणा देत राहतात. याचसाठी प्रत्येकाला आपल्या पूर्वजांविषयी अधिकाधिक आणि अचूक माहिती असणे आवश्यक आहे. पूर्वजांविषयी अधिकृत आणि सविस्तर माहिती एकत्रितपणे पुरविण्याचे महत्वाचे कार्य कुलवृत्तांताद्वारे साधले जाते. कुलवृतांत अप्रत्यक्षरीत्या आणि मर्यादित स्वरूपात त्या त्या काळाच्या समाजाचे चित्रण करीत असतात.

श्री दत्तात्रय गजानन आठवले आणि त्यांचे बंधू श्री चंद्रकांत गजानन आठवले यांनी ‘आठवले कुलवृत्तांत’ तयार करण्याचे सुनिश्चित करून २००१ च्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्यांच्या मातोश्रींचे आशीर्वाद घेऊन या कार्याची सुरुवात केली. प्रथम 'आठवले कुलवृत्तांत ’ १९९२ मध्ये डोंबिवली येथे श्री. शं.ना.नवरे र्याांच्या हस्ते प्रसिद्ध झाला. त्यामध्ये फारच थोड्या आठवले घराण्यांची माहिती त्रोटक स्वरूपात दिलेली आढळली. माहिती गोळा करण्यासाठी ह्या दोघांनी अथक व अखंड परिश्रम केले, महाराष्ट्रभर भ्रमंती केली, तीर्थक्षेत्री जाऊन पुरोहितांची दफ्तरे धुंडाळली. मोडी लिपी शिकून पुरालेखा विभागातून आठवले मंडळींच्या संदर्भातील सुमारे १५० पत्रे मिळवली. सर्वानी तो छापून प्रसिद्ध करण्याचे ठरवले.परंतु छपाईचा खर्च मोठा  असल्यामुळे दिनांक ९ एप्रिल २००६ रोजी सर्व पुणेकरांना बोलावून एक सभा घेतली. त्यामधे पहिले श्री. विजय मुकुंद आठवले, संस्थापक संचालक, Shogini Technoarts Pvt. Ltd. यांनी न मागता  रू ५०,०००/-ची देणगी देऊन आणि नंतर अजूनही मदत  लागल्यास ती करण्याचे अभिवचन देऊन एक सुखद धक्काच दिला. अशा प्रकारे अनेक मंडळींनी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या  मदत करून ‘आठवले कुलवृत्तांत’- दुसरी आवृत्ती २००७ साली प्रसिद्ध करण्यात आपले योगदान दिले.

महाराष्ट्रात आजपर्यंत सुमारे शंभर हून अधिक कुलवृत्तांत प्रसिद्ध झालेले आहेत.

आपल्या आठवले कुलाचा ‘चित्पावन’ या शब्दाशी अतूट संबंध आहे. तसेच सर्व आठवले कुलाचे गोत्र ‘अत्रि’ असून मूळ पुरुष अत्रि ऋषी असल्याने आपण सर्व धार्मिक विधींतून ‘अत्रि गोत्रोत्पन्नोऽहं’ असा पुनरुच्चार करतो. मात्र एका संशोधनानुसार ‘अष्टवेले - आठवेले - आठवले ’ असा आपल्या  आठवले या आडनावाचा अपभ्रंश होत प्रवास झालेला आहे.

डॉ. प.वि.वर्तक  या  विद्वान आणि ज्येष्ठ विचारवंतांच्या मते चित्तपावन हे बाहेरून आलेले नसून ते मूळ भारतीयच  आहेत त्यांनी परशुरामाबरोबर कोकणात येऊन वस्ती केली. डॉ.मधुकर अष्टीकर यांच्यामते देखील चित्तपावन हे मूळचे भारतीय ब्राह्मणच आहेत. 

सुप्रसिद्ध इतिहास संशोधक वा.वि.भिडे यांनी साधक-बाधक सखोल अभ्यासानंतर स्पष्ट प्रतिपादन केले आहे की चित्तपावन हे वैदिक धर्मीय आर्य आहेत.