श्री. श्रीकृष्ण गंगाधर आठवले


पूल बांधणीतील आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ
जन्म 1946
वंशावळ संदर्भ : सोमेश्वर 1/3अ

आज वयाच्या 82व्या वर्षी देखील तरुणाच्या उत्साहाने दिवसातून आठ तास काम करणारे आणि अगदी वेगळ्याच क्षेत्रात म्हणजे पूलबांधणीच्या क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा दैदिप्यमान ठसा उमटविणारे जागतिक कीर्तीचे तज्ज्ञ म्हणून श्रीमान श्रीकृष्ण गंगाधर आठवले यांचा अत्यंत गौरवपूर्वक उल्लेख करावा लागेल. त्यांची स्वत:ची ‘आठवले - लिस्टॅड अ‍ॅण्ड असोसिएट’ नावाची पूलबांधणी क्षेत्रातील कन्सल्टिंग इंजिनिअरिंग फर्म सन 1985 पासून गेल्या 30 वर्षांहून अधिक काळ अमेरिकेत वॉशिंग्टनमध्ये स्वतंत्रपणे कार्यरत असून आज तिला विशेष प्रतिष्ठा प्राप्त झालेली आहे. या फर्मचे श्री. श्रीकृष्ण गंगाधर हे प्रमुख असून त्यांच्या हाताखाली विविध देशातील निष्णात वीस इंजिनिअर्सचा ताफा काम करीत आहे. त्यांनी आजवर अनेक पुरस्कार मिळविले आहेत. पूलबांधणी क्षेत्रातील उत्कृष्ट भारतीय फर्म म्हणून सन 2004चा पुरस्कार या कंपनीने अमेरिकेकडून पटकावला आहे याहून अधिक गौरव तो कोणता ? अर्थातच या श्रेयाचे नि यशाचे प्रमुख शिल्पकार श्रीकृष्ण गंगाधर आठवले हेच आहेत यात शंका नाही.

असामान्य नि अद्वितीय यश संपादन करणार्‍या कर्तृत्ववान श्रीकृष्णाचा (श्रीकृष्ण गंगाधर आठवले) यांचा जन्म सोलापूर जिल्ह्यातील वेळापूर गावी दि. 6 जून 1924ला झाला. त्यांचे वडील झ. थ. ऊ. खात्यात सरकारी नोकरीला होते. त्यामुळे त्यांच्या वारंवार बदल्या होत. परिणामी श्रीकृष्णाच्या शिक्षणाचा रितसर प्रारंभ न होता थोडी आबाळच झाली. परंतु उपजत हुषार असल्यामुळे पुढे ते शिक्षणात देखील अग्रेसरच राहिले. वयाच्या दहाव्या वर्षी त्यांनी शाळेचे तोंड पाहिले ते एकदम वरच्याच यत्तेत प्रवेश घेऊन आणि शालेय शिक्षण पूर्ण केले ते वयाच्या 15व्या वर्षी तेव्हाची मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण होऊनच. कोपरगाव व नाशिक येथे त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. पुढे पुण्यात येऊन त्यांनी फर्ग्यूसन कॉलेजात प्रवेश मिळवला. महाविद्यालयात ते सर्व मुलांमध्ये लहान दिसत असल्यामुळे शिक्षकांना ते शालेय विद्यार्थीच भासत. श्रीकृष्णाचा इंजिनिअरिंगच्या क्षेत्राकडे ओढा असल्यामुळे बी. एस्सी. झाल्यावर इंजिनिअरिंग मधील ऑनर्स पदवी सन 1948 मध्ये मुंबई विद्यापीठातून वयाच्या 24व्या वर्षी संपादन केली.

याच वर्षी श्रीकृष्णाचा विवाह (दि. 3/4/1948) पुण्याच्या वासंती माधव सहस्त्रबुद्धे या सुविद्य नि संगीत तज्ज्ञ मुलीबरोबर झाला. वयाच्या अठराव्या वर्षी वासंती सहस्त्रबुद्धे विवाहबद्ध होऊन सौ. वासंती श्रीकृष्ण आठवले बनल्या. नाट्य नि संगीत प्रेमी वासंतीबाई अमेरिकेत गेली कित्येक वर्षे मराठी-हिंदी नाटकांचे दिग्दर्शन करीत आहेत, सुगम संगीत कार्यक्रमांतून भाग घेत आहेत, हार्मोनियम वरही साथ देत आहेत इतकेच नव्हे तर वॉशिंग्टनमध्ये मुलांना व मोठ्या व्यक्तींनादेखील संगीत शिक्षणाचे धडे देत आहेत. संगीताप्रमाणे त्यांना वाचनाचीही आवड आहे. गेली 55 वर्षे श्रीकृष्ण-वासंती यांचा संसाररथ उत्साहाने नि दमदारपणे मार्गक्रमण करीत आहे ही खरोखरच अत्यंत भाग्याची गोष्ट आहे.

श्रीकृष्ण-वासंती यांच्या संसारवेलीला चार कन्यारत्नांच्या रूपाने सुरेख फुले आली. अंजली-हेमा-ज्योती नि सीमा ही त्यांची नावं असून या चारही कन्या उच्च शिक्षित असून आपापल्या संसारात रमलेल्या आहेत. थोरली अंजली ही आर्किटेक्ट असून ती आता अंजली अनिल गुलाटी झाली आहे. दुसर्‍या क्रमांकाची कन्या हेमा ही अमेरिकेत एम्. एस्. होऊन कॉम्प्यूटरमधील तज्ज्ञ बनून आता हेमा मन्सूर अहमद झाली आहे. क्रमांक तीनची ज्योती चार्टर्ड अकाऊंटंड असून सासरची ज्योती मिर्को झाली आहे. तर चौथ्या क्रमांकाची सर्वात धाकटी कन्या सीमा ही देखील चार्टर्ड अकाऊंटंड असून सासरची सीमा रॉबर्ट ओवेन बनली आहे. सीमा ही आठवले यांच्या कंपनीचे हिशेब तपासण्याचे काम सांभाळते आहे. श्रीकृष्ण-वासंती यांचे गेल्या तीस वर्षांहूनही अधिक काळापासून अमेरिकेत मेरी लँड येथे कायमचे वास्तव्य असून आश्चर्याची नि आनंदाची गोष्ट म्हणजे त्यांच्या चारही विवाहित कन्यांचे वास्तव्य त्यांच्यापासून जवळच्याच म्हणजे 20-25 मैलांच्या परिसरात असून प्रत्येकीचे स्वतंत्र बंगले आहेत. अर्थात श्रीकृष्ण-वासंती यांचे कायमचे वास्तव्य जरी अमेरिकेत असले तरी ते आपल्या मातृभूमीला मूळ गावाला नि वंशाला विसरलेले नाहीत. त्यांची पुण्यातही स्वत:ची जागा (प्रशस्त ब्लॉक) असून ते दरवर्षी न चुकता डिसेंबर-जानेवारी दोन महिने येऊन राहतात. आप्त स्वकीयांना भेटतात. अनेक संस्थांना, देवस्थानांना देणग्या देऊन सामाजिक कार्याला हातभार लावतात. संगीत-नाट्य नि सांस्कृतिक कार्यक्रमांना हजेरी लावतात.

श्रीकृष्ण गंगाधर आठवले यांनी स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग मधील पदवी संपादन केल्यावर त्यांना पूलबांधणी क्षेत्राचे आकर्षण नि ओढ असल्यामुळे त्यांनी त्याच क्षेत्रात नोकरीच्या निमित्ताने पदार्पण केले आणि आपल्या अथक् परिश्रमाने त्याच क्षेत्रात वेगवेगळ्या माध्यमातून आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला. लंडनच्या रेडेल पोमर अ‍ॅन्ड ट्रिटन (ठशपवशश्र, झरश्राशी । ढीळीींेंप) नावाच्या कलकत्त्याच्या हावरा पूल व भारतातील अनेक रेल्वे पूल बांधणार्‍या कंपनीत मोठ्या अधिकार पदावर काम केले. खास निमंत्रणावरून नंतर काही काळ दिल्लीच्या उत्तमसिंग दुगल कंपनीत काम केले. त्यानंतर काही वर्षे त्यांनी अमेरिकेतील वॉशिंग्टनमधील डेव्हिड व्होल्कार्ट अ‍ॅन्ड असोसिएट या पूल बांधणीतील अग्रेसर कंपनीत अधिकार पदावर काम केले. पँन्चो ट्रेन लेक ब्रिज हा 29 मैल लांबीच्या प्रचंड पुलाचे बांधकाम याच कंपनीमार्फत झाले आहे. पुढे त्यांनी ठरवलं की आपण स्वत:चीच पूलबांधणीतील सल्लागार कंपनी स्थापन करून या क्षेत्रात स्वत:चं कर्तृत्व सिद्ध करावं. हा निश्चय करून ते थांबले नाहीत. तर आपलं स्वप्न त्यांनी प्रत्यक्षात उतरवलं. मॅसॅच्युसेटस् विद्यापीठाची एम्. एस्सी. पदवी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेली मेरी लिस्टँड नावाची या क्षेत्रातील निष्णात महिला त्यांना सहकारी म्हणून मिळाली. तसंच टेवोल्डी आयोब हा देखील कष्टाळू अन् प्रामाणिक तज्ज्ञ सहकारी त्यांना मिळाला. आणि त्यांनी या लेखारंभी वर उल्लेख केल्याप्रमाणे ‘आठवले लिस्टँड अ‍ॅन्ड असोसिएट’ या नावाची स्वत:ची कंपनी स्थापन केली. स्वत:च्या प्रामाणिक नि सचोटीच्या कार्यशैलीमुळे आणि पूर्वीचा लौकिक नि कीर्ती पाठीशी असल्यामुळे त्यांना नव्या-नव्या कामांचा कधीच तुटवडा भासला नाही - भासत नाही. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज शेकडो पुलांची निर्मिती झालेली आहे. गेल्या तीस वर्षात अनेक पुरस्कार - पारितोषिके मिळाली आहेत. त्यांची यशस्वी घोडदौड आजही पुढे चालूच आहे.

श्रीकृष्ण गंगाधर आठवले हे आज खर्‍या अर्थाने तृप्त - समाधानी जीवन जगताहेत. आजही ते दिवसातून आठ-आठ तास काम करताहेत. त्यांची प्रकृती सुदैवाने ठणठणीत आहे. कोणत्याही प्रकारच्या आजाराने ते त्रस्त नाहीत. ते एकदा सहज डॉ. विल्सन नावाच्या डॉक्टरांकडे आपली प्रकृती दाखविण्यास गेले, विविध चाचण्या केल्या. सर्व रिपोर्टस् नॉर्मल. त्यांना कोणत्याही प्रकारचा आजार नसल्याचं आणि त्यांची प्रकृती उत्तम नि ठणठणीत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. या गोष्टीचा त्यांना सार्थ अभिमान वाटतो.
श्रीकृष्ण आठवले नि त्यांच्या पत्नीला संगीताची आवड असल्यामुळे पुण्यातील सवाई गंधर्व संगीत महोत्सवाला ते आवर्जून आपली उपस्थिती लावतात. त्यांना ब्रिज, पोकर, रमी आदी पत्त्यातील खेळांची आवड आहे तशीच गोल्फ, रेस यांचीही आवड आहे. जीवनात यशस्वी होण्यासाठी 90 टक्के कठोर परिश्रमाची तयारी आणि 10 टक्के हुषारी यांची गरज आहे असं त्यांचं ठाम मत आहे. प्रमाणपत्रांपेक्षाही (कोणत्याही क्षेत्रातील) जिज्ञासू वृत्ती महत्त्वाची कारण तीच तुम्हाला यशाकडे नेते यावर त्यांचा विश्‍वास आहे. म्हणूनच जिज्ञासू वृत्ती नि कठोर परिश्रम यांना पर्याय नाही हाच त्यांचा पुढील पिढीला-तरुण वर्गाला संदेश आहे.
श्रीकृष्ण आठवले यांच्याशी गप्पा मारीत असता त्यांनी 50 वर्षांपूर्वीची एक अविस्मरणीय आठवण सांगितली. ती आदरणीय पांडुरंगशास्त्री आठवले यांच्याविषयीची आहे. अर्थात त्यावेळी दोघेही एकमेकांना ओळखत देखील नव्हते. मुंबई-पुणे असा तो रेल्वेचा प्रवास होता. गाडीला खूप गर्दी होती. आरक्षणही शक्य नव्हतं. श्रीकृष्णांना गाडीत जागा मिळेना. श्रीकृष्णांच त्यावेळी तरुण वय होतं. इंजिनिअर होऊन चांगल्या नोकरीत होते. त्यांच्या नोकराने पूर्ण गाडीची पाहणी करून श्रीकृष्णांना सांगितलं की गाडीची एक मोठी कुपी रिकामी आहे. तिच्याच एकच सद्गृहस्थ आहेत. (ते पांडुरंगशास्त्री होते व त्यांच्यासाठी संपूर्ण कुपी आरक्षित केली होती.) श्रीकृष्णांनी एक संधी (चान्स) घेण्याच्या उद्देशाने त्या डब्याजवळ येऊन दारावर टक् टक् केलं. आतील गृहस्थांनी दार उघडलं. श्रीकृष्णांनी त्यांना आपली अडचण सांगून डब्यात घेण्याविषयी विनंती केली. त्या गृहस्थांनी उदार मनाने त्यांना प्रवेश दिला. श्रीकृष्णांचा स्वभाव बोलका-थोडासा बडबड्याच. त्यामुळे श्रीकृष्णजी बोलत होते. अनेक प्रसंग - विषय बोलण्यात येत होते. श्रीकृष्णजी वक्ता आणि पांडुरंगशास्त्री श्रोता बनले होते. मध्येच श्रीकृष्णांनी त्या गृहस्थांना त्यांचं नाव विचारलं. त्यावर ते आठवले एवढंच म्हणाले. श्रीकृष्णजी म्हणाले की मी तुमचं नाव विचारलं. माझंच काय सांगता ? तेव्हाच दोघेही आठवलेच असल्याचं स्पष्ट झालं. वाटेत कर्जतला गाडी थांबली तेव्हा फलाटावर 35-40 जणांचा जमाव शास्त्रीबुवांच्या स्वागताला जमलेला होता. कुणी त्यांना पुष्पहार घातले, पुष्पगुच्छ दिले, मिठाई दिली. ते सर्व पाहून श्रीकृष्णजी मनात समजले की ही कोणीतरी बडी आसामी आहे. पुढे पुणे स्थानक आल्यावर तर शंभर-दीडशे लोकांचा - भक्तांचा जमाव पांडुरंगशास्त्रींच्या स्वागतार्थ नि सन्मानार्थ जमलेला होता. ही गोष्ट जेव्हा श्रीकृष्णजींनी घरी आल्यावर आपल्या आईला सांगितली तेव्हा ती म्हणाली की, अरे श्रीकृष्णा ते थोर गृहस्थ म्हणजे आपले पांडुरंगशास्त्री आठवले होते. एवढ्या मोठ्या थोर व्यक्तीबरोबर तुला प्रवास करायला मिळाला, त्यांचं सान्निध्य लाभलं. तू खरोखरच भाग्यवान आहेस. पांडुरंगशास्त्रींसारखा स्वाध्याय परिवाराचा प्रणेता, उत्तम वक्ता, प्रवचनकार किती मोठा, उत्तम श्रोतादेखील असू शकतो त्याचा श्रीकृष्णांना प्रत्यय आला. ही त्यांची आठवण खरोखरच अविस्मरणीय आहे.

शब्दांकन : क्रांतिसेन आठवले