जीवनकाल: 1910 ते 1975
वंशावळ संदर्भ : सोमेश्वर 16
शान्ताराम आठवले यांचा जन्म 21 जानेवारी 1910 ला पुण्याला - कसबा गणपतीजवळच्या सरदार शितोळे यांच्या वाड्यात झाला.
शान्तारामांचे वडील गोविंद हे ग्वाल्हेरच्या सरदार शितोळ्यांचे पुण्यातले कारभारी होते. त्यांचा आवाज सुरेल होता आणि संगीताची त्यांना विलक्षण ओढ होती. त्यांनी लळितं केली आणि लावणी गाण्यांत प्रावीण्य मिळवलं. त्यांचं वाचन दांडगं होतं. एखाद्या कसलेल्या नटाप्रमाणे स्वच्छ, रसानुकूल आणि नादमय अशी त्यांची वाचनशैली होती.
शान्तारामांची आई गंगा ही साक्षर नव्हती पण सुसंस्कृत होती. तिला लिहिता वाचता येत नव्हते पण तिच्या जिभेवर साक्षात सरस्वती होती. जुन्या ओव्या, घरगुती पारमार्थिक गाणी यांचा न संपणारा साठाच तिच्याजवळ होता. शब्द आणि भाव यांचं नातं इथेच केव्हातरी त्यांच्या मनात रूजलं असावं.
शान्तारामांचे शालेय शिक्षण पुण्याच्या भावे स्कूलमधे झाले. शाळेत असताना कला आणि साहित्य ही दोन्ही क्षेत्रं त्यांनी गाजवली. शाळेत असतानाच त्यांच्या कविता नियतकालिकांमधून प्रसिद्ध होऊ लागल्या होत्या. वाचन व लिखाणाबरोबरच अभिनय आणि दिग्दर्शनाची क्षेत्रंही यशस्वितेनं पादाक्रान्त करण्याचं भाग्य शान्तारामांना लाभलं. हस्तलिखितं, मासिकं, वक्तृत्त्वसभा जशा त्यांनी गाजविल्या तशी शाळेच्या संमेलनांत बेबंदशाही, शिवसंभव यासारखी सरस नाटकंही त्यांनी रंगभूमीवर आणली, दिग्दर्शित केली, त्यांत भूमिकाही केल्या.
1929 साली वडिलांना पक्षाघात झाला आणि त्यातच त्यांचा अंत झाला. 1930 साली शान्ताराम मॅट्रिक झाले. 1931 साली आठवले कुटुंब पुण्याहून थेऊर जवळच्या कोलवडीला आलं.
सुप्रसिद्ध कादंबरीकार ना. ह. आपटे यांची आणि शान्तारामांची पत्रमैत्री होती. आपट्यांच्याच विनंतीवरुन त्यांच्या मधुकर मासिकाचं काम आणि मुद्रणालयाची व्यवस्था पहाण्यासाठी त्यांचा सहाय्यक म्हणून शान्तारामांनी काम स्वीकारलं आणि कोलवडीला राम राम ठोकून कोरेगांव गाठलं.
प्रभात फिल्म कंपनीने चित्रपटाच्या कथेसाठी ना. ह. आपटे यांना पाचारण केलं. त्यांच्या ‘भाग्यश्री’ या कादंबरीवर आधारित ‘अमृतमंथन’ या चित्रपटाचं काम सुरु झालं. शान्तारामांची साधी सोपी काव्यरचना आपट्यांना प्रभावित करून गेली होतीच. त्यामुळे अमृतमंथनच्या पद्य लेखनासाठी त्यांनी साहजिकच शान्तारामांचं नांव सुचवलं आणि 1 जानेवारी 1935 रोजी शान्ताराम आठवले प्रभात फिल्म कंपनीत रूजू झाले.
1939 साली शान्तारामांचा विवाह रामदुर्गच्या लीला सहस्त्रबुद्धे यांच्याशी झाला. दोन मुली - मंगला, अभया आणि मुलगा - सुदर्शन ह्या चिमण्यांनी घरटं गजबजून गेलं. शान्तारामांच्या पत्नी लीलाबाई उर्फ ‘सुमती’ खरोखरीच ‘सु मती’ होत्या. आपल्या पतीच्या कर्तबगारीचा त्यांना सार्थ अभिमान होता. बर्या वाईट परिस्थितीत सुमतीबाईंनी अतिशय समर्थपणे घर सांभाळले. सुमतीबाई हे त्यांच्या प्रतिभेच्या पंखातलं बळ होतं.
प्रभात फिल्म कंपनीच्या अमृतमंथन, संत तुकाराम, कुंकू, गोपाळकृष्ण, माझा मुलगा, संत ज्ञानेश्वर, शेजारी, दहा वाजता, संत सखू आणि रामशास्त्री यासारख्या नितांतसुंदर चित्रपटांनी रसिकांना नेहमीच मोहित केले आहे. या चित्रपटांचे एक शक्तिस्थान होते - शान्ताराम आठवले यांची सहज, सोपी, अर्थवाही गीते ! रंगभूमीच्या वर्चस्वाखाली असलेले चित्रपट जसे हळूहळू प्रभातच्या संस्थापकांनी समाजाभिमुख केले तसेच संस्कृतप्रचुर क्लिष्ट गीतांनाही साध्या सोप्या भावगीतांचे रूप मिळाले. आधी बीज एकले, लखलख चंदेरी, भारती सृष्टीचे सौंदर्य खेळे, मन सुद्ध तुझं, दोन घडीचा डाव यासारखी गीते घराघरांचे दरवाजे उघडून अंगणा - परसातून, माजघरांत, शेजघरांत एवढेच नव्हे तर देवघरांतही पोचली. स्त्री-पुरुष, आबाल-वृद्ध सर्वांच्या ओठांवरून हृदयांत जाऊन बसली.
ग. दि. माडगूळकर चित्रपटक्षेत्रांत आले त्यावेळी त्यांच्यासमोर असलेला आदर्श होता तो शान्ताराम आठवल्यांचा !
‘प्रभात चित्रांचा गीतकार’ ही शान्ताराम आठवल्यांची महत्त्वाची पण अपूर्ण ओळख आहे. प्रभात सोडल्यानंतर त्यांनी स्वत: दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांखेरीज ‘श्रीगुरुदेव दत्त’, ‘झंझावात’, ‘संत भानुदास’, ‘मर्द मराठा’, ‘बेलभंडार’, ‘गोकुळचा राजा’, ‘विठ्ठलपायी’, ‘सुभद्राहरण’ अशा अनेक चित्रपटांसाठी तीनशेहून अधिक चित्रपटगीते लिहिली. त्यांच्या गीतांना सुधीर फडके, राम कदम, दत्ता डावजेकर, स्नेहल भाटकर, वसंत पवार, पु. ल. देशपांडे अशा अनेक संगीतकारांनी संगीत दिलं.
चित्रपटगीतांव्यतिरिक्तही त्यांनी अनेक भावगीते, कविता लिहिल्या. त्यांचे ‘एकले बीज’, ‘बीजांकुर’ हे कवितासंग्रहही प्रसिद्ध झाले. सामान्य माणसाच्या रोजच्या जीवनांतील ‘साध्या विषयांत मोठा आशय’ शोधणार्या, वर्मावर बोट ठेवून, गुदगुल्या करणार्या नर्म, विनोदी कविता हे त्यांचे खास वैशिष्ट्य. त्यांच्या अशा अनेक कविता त्या काळांत नियतकालिकातून, मासिकांमधून प्रसिद्ध झालेल्या आहेत.
कवी - गीतकार हा त्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा एक पैलू आहे. चित्रपट दिग्दर्शक, निर्माता, पटकथालेखक, नट, अध्यात्म, ज्योतिष, ज्ञानेश्वरी, शास्त्रीय दृष्टिकोनातून भारतीय संस्कृती, यासारख्या विषयांचा गाढा अभ्यासक, प्रवचनकार आणि एक सज्जन, सहृदय सुहृद - असे त्यांचे इतर पैलू तितकेच तेजस्वी - लखलखीत आहेत. निवडलेल्या प्रत्येक कार्यक्षेत्रांत त्यांनी अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत. प्रभातमध्ये गीतलेखन करीत असताना चित्रपटकथेची निवड, तिचं वाचन, पटकथा लेखन, संवाद, प्रत्यक्ष चित्रीकरण, दिग्दर्शन, संकलन, इतकंच नव्हे तर वितरण, जाहिरात या सर्व प्रांतात त्यांना काम करायला मिळालं. नवनव्या संधी मिळवता आल्या. त्यातून त्यांचा अनुभव समृद्ध होत गेला.
प्रभात सोडल्यानंतर, 1942 च्या भूमिगत क्रान्तिकारकांच्या चळवळीवर आधारित, त्यांनी ‘भाग्यरेखा’ नावाच्या चित्रपटाची निर्मिती केली. पु. ल. देशपांडे नायक आणि शान्ता आपटे नायिका असलेल्या या चित्रपटाचे पद्यलेखन आणि दिग्दर्शनही शान्ताराम आठवल्यांचेच होते. ना. ह. आपटे यांच्या कथे वरील या चित्रपटाचे खास वैशिष्ट्य असे होते की याच्या निर्मिती साठी त्यांनी ‘भारत चित्र दर्शन’ नांवाची सहकारी संस्था स्थापन केली होती आणि सुप्रसिद्ध साहित्यिक तात्यासाहेब केळकर हे त्या संस्थेचे एक ठेवीदार होते. (1947-1948)
‘वहिनींच्या बांगड्या’ या पंचवीस चित्रगृहांत रौप्यमहोत्सव साजरा केलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि पद्यलेखन त्यांनी केले. हा चित्रपट मुहुर्तापासून सेन्सॉर सर्टिफिकिटापर्यंत केवळ पस्तीस दिवसांत पूर्ण केला होता. या चित्रपटाद्वारे त्यांनी सुलोचना या अभिनेत्रीला तमाशाच्या फडातून गृहस्थाच्या घरांत आणले. त्यातील ‘तू नसतीस तर’ यासारखी सुधीर फडके यांनी संगीत दिलेली गीते अजूनही रसिकांच्या स्मरणांत आहेत. या चित्रपटांत त्यांनी स्वत: अभिनयही केला होता. (1952)
ना. ह. आपटे यांच्या ‘कलंकशोभा’ या कादंबरीवर आधारित ‘संसार करायचाय मला’ या चित्रपटाची ‘चित्रगंगा’ या स्वत:च्या संस्थेतर्फे त्यांनी निर्मिती, दिग्दर्शन व पद्यलेखन केले. राम कदम यांचे संगीत असलेल्या या चित्रपटांत वेश्याविवाह हा सामाजिक प्रश्न हाताळला होता. बेबी शकुंतला या चित्रपटाची नायिका होती. (1953)
‘शेवग्याच्या शेंगा’ या त्यांच्या चित्रपटाला जर्मनीतील कान्स चित्रपट महोत्सवांत ‘क्रिटिक अॅवॉर्ड’ने गौरविले गेले होते. मराठी चित्रपटाला हा आंतरराष्ट्रीय बहुमान बहुदा पहिल्यांदाच मिळाला होता. यातील ‘सुख देवासी मागावे’ ही प्रार्थना शांताराम आठवले यांचे परिणामकारक शब्द आणि सुधीर फडके यांच्या संगीताने संस्मरणीय ठरली. (1954)
‘फिल्मिस्तान’ या हिंदी चित्रपट निर्माण करणार्या प्रसिद्ध संस्थेतर्फे बालगंधर्व आणि केशवराव भोसले यांच्या संयुक्त मानापमानाच्या पार्श्वभूमीवरील, नाट्यसृष्टीचे वैभव पडद्यावर आणणारा ‘पडदा’ हा चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केला होता. बाळ कोल्हटकरांची पटकथा असलेली गायक अभिनेता आणि अभिनेत्री यांची ही एक अनोखी प्रेमकहाणी होती. (1956)
‘फिल्म डिव्हिजन’ मध्ये काम करताना त्यांनी राजस्थानातील पाणीप्रश्नावर आणि आसामच्या लोकगीतांवर अप्रतिम अशा डॉक्युमेन्टरीज् बनवल्या. (1960 - 1964)
शंकर पाटील यांच्या कथेवर आधारित ‘वावटळ’ या त्यांच्या ग्रामीण पण तमाशा नसलेल्या चित्रपटाला पु. ल. देशपांडे, विश्राम बेडेकर आणि गजानन जहागिरदार यासारख्या परीक्षक मंडळाने महाराष्ट्र सरकारची दहा अॅवॉर्डस् देऊन गौरविले. (1965)
चित्रपटक्षेत्रांत असतानाही साहित्याशी त्यांची जवळीक तर होतीच पण शब्दांशी क्रीडा करताना ‘शब्दांच्या पलिकडले’ असे काही त्यांना आकर्षित करीत होते. सन्त वाङ्मयाचा अभ्यास आणि हे कुतूहल यातून अध्यात्माकडे ते आकर्षित झाले. ज्ञानेश्वरीची पारायणे हा त्यांचा पहाटेचा आवडता उद्योग होता. आयुष्यातील चढउताराकडे तटस्थपणे पाहातानाही या मागच्या शक्तीची त्यांना जाणीव होती. त्यातून त्यांनी ज्योतिष्याचाही अभ्यास केला. या सर्वांचा परिपाक म्हणजे त्या त्या क्षेत्रातील संदर्भग्रंथ ठरावेत अशा पुस्तकांचे त्यांनी लेखन केले. ‘शांताचिया घरा’, ‘साधा विषय मोठा आशय’, ‘सुखाची लिपी’, ‘बकुळफुले’, ‘ओंकार रहस्य’, ‘कुंडलिनी जगदंबा’, ‘नाडीग्रंथ एक अभ्यास’, ‘ज्ञानदेवीची आराधना’ या सारखी दहाहून अधिक पुस्तके प्रसिद्ध झाली.
प्रभात फिल्म कंपनीबद्दल अनेक पुस्तके, डॉक्युमेंटरीज आणि इतर माध्यमातून माहिती उपलब्ध आहे. पण त्या सगळ्यापेक्षा स्वत:च्या डोळ्यांनी पाहिलेल्या घडामोडी प्रांजळपणे, स्पष्टवक्तेपणाने आणि सत्य न लपवता लिहिलेले शान्ताराम आठवले यांचे ‘प्रभातकाल’ हे पुस्तक वेगळे आणि महत्त्वपूर्ण ठरले आहे.
हे पुस्तकातील ज्ञानभांडार लोकांना खुले व्हावे यासाठी त्यांनी संपूर्ण देशभर प्रवचने दिली. पुण्यातील कबीरबागेसारख्या संस्थांनी त्यांची व्याख्याने आयोजित करून अभ्यासूंना मोलाचे मार्गदर्शन केले.
लहान मुलार्ंवर नितांत प्रेम करणारे शान्ताराम आठवले त्यांच्यासाठी ‘तात्या’ होते. त्यांची बालगीते आणि छोट्यांसाठीच्या गोष्टी पुस्तकरुपाने प्रसिद्ध झाल्या आहेत. धोतराचा सोगा खांद्यावर टाकून शेजारपाजारच्या एखाद्या मुलाला स्वरचित बालगीत म्हणून खेळवणारे, आपले हजारो चहाते, हितचिंतक, मित्र यांना प्रत्येक दीपावलीला काव्यभेट पाठवणारे शान्ताराम आठवले - हा सहृदय, भावूक माणूसही कित्येकांच्या जीवनाचा एक महत्त्वाचा हिस्सा बनले आहेत.
या प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्त्वाने मराठी चित्रपटसृष्टी आणि मराठी माणसांना जे काही अलौकिक दिले त्याची थोडीशी उतराई व्हावे अशा उद्देशाने त्यांच्या कुटुंबियांनी ‘याला जीवन ऐसे नांव’ या नांवाचा एक कार्यक्रम नुकताच सादर केला. या कार्यक्रमाच्या पुन:प्रत्ययाचा आनंद रसिकांना मिळत राहावा, नवीन पिढीलाही मागील संचिताचा लाभ होत रहावा यासाठी या कार्यक्रमाची व्हीसीडी ही तयार केली गेली आहे. फाउंटन म्युझिक कंपनीने वितरित केलेली ही व्हीसीडी सर्वत्र उपलब्ध आहे.
उत्तुंग कल्पनाशक्ती, ज्ञानाची खोली, आणि चौफेर अनुभव यामुळे शान्तारामांचे संवेदनाक्षम व्यक्तिमत्त्व प्रत्येकाला आकर्षित करीत असे. त्यांच्या सहवासांत समई सारखा शांत प्रकाश, चंदनासारखा मंद, मोहक सुगंध आणि निरलस आनंद मिळत असे. किती तरी लोकांची आयुष्यं त्यांच्या संपर्कात येऊन उजळली, उमलली, दरवळली.
कालपटावर स्वत:च्या कर्तृत्त्वाचा स्वतंत्र ठसा उमटवून शांताराम आठवले दि. 2 मे 1975 ला इहलोकींची यात्रा संपवून वयाच्या 66 व्या वर्षी शांत मनाने नि कृतार्थतेच्या समाधानात पंचत्त्वात विलीन झाले !
शब्दांकन: सुदर्शन शांताराम आठवले