रामचंद्र महादेव आठवले


तत्त्वनिष्ठलेखक, वक्ते, इतिहाससंशोधक आणि ज्वलंत हिंदुत्वाचे कट्टर पुरस्कर्ते
जीवनकाल 1901 ते 1988
नाचणे 6

दिनांक 1 नोव्हेंबर 1901ला जन्मलेल्या आणि अष्टपैलू व्यक्तिमत्त्व लाभलेल्या एका अत्यंत तत्त्वनिष्ठ प्रखर आयुष्य जगलेल्या रामचंद्र महादेव आठवले यांचे दिनांक 31 डिसेंबर 1988ला वयाच्या 88व्या वर्षी देहावसान झाले. त्यांच्या निधनाने जणू एक वृक्षच उन्मळून पडला ! ‘मोडेन पण वाकणार नाही’ हे लोकमान्य टिळकांचं ब्रीद आमरण आचरणात आणणारा अखेर परिस्थितीपुढे न वाकता वयाच्या 88व्या वर्षी ताठ मानेने मृत्यूला सामोरा गेला ! अनेक संकटे कोसळली तरी शेवटपर्यंत उराशी बाळगलेल्या तत्त्वांशी तडजोड न स्वीकारणारा खरा तत्त्वनिष्ठ या जगाचा निरोप घेता झाला ! स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या हिंदुत्ववादी राजकीय तत्त्वज्ञानाचा निष्ठावंत प्रचारक या जगातून कायमचा निघून गेला ! हिंदुहितासाठी झगडणारं आणि हिंदुत्वाच्या रक्षणासाठी तळमळणारं एक परखड व जहाल व्यक्तिमत्त्व आपल्यातून नाहीसं झालं ! जुन्या पिढीतील ज्येष्ठ साहित्यिक, पल्लेदार विद्वान, तत्त्वनिष्ठ इतिहास संशोधक, पत्रकार, प्रभावी वक्ते म्हणून सार्‍या महाराष्ट्रात विख्यात असलेले रामचंद्र महादेव आठवले यांचं वयाच्या 88व्या वर्षी दि. 31 डिसेंबर 1988ला अंधेरीतील (मुंबई) त्यांच्या राहत्या घरी वृद्धापकालीन अल्प आजाराने निधन झालं. रा. म. आठवले यांचे व्यक्तिमत्त्व विविध पैलूंनी युक्त असलं तरी कट्टर राष्ट्रवाद - हिंदुराष्ट्रवाद हाच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा स्थायीभाव होता यात शंका नाही.

रामचंद्र  महादेव आठवले हे साहित्यिक वर्तुळात ‘रामभाऊ’ या नावाने ओळखले जात तर नातेवाईक व कुटुंबीय मंडळी त्यांना ‘बाबूराव’ या नावाने संबोधीत. आपण ह्या परिचयलेखात त्यांचा उल्लेख ‘रा. म.’ असा करू.
रा. म. यांचा जन्म दि. 1 नोव्हेंबर 1901ला मुंबईत फणसवाडी येथे झाला असला तरी त्यांचं शालेय शिक्षण रत्नागिरीच्या शासकीय प्रशालेत झालं तर महाविद्यालयीन शिक्षण मात्र मुंबईत झालं. शालेय जीवनापासूनच त्यांना लेखनाची व कविता करण्याची गोडी लागली. राष्ट्रीय भावनेचे संस्कारदेखील त्यांच्यावर त्याच वेळेपासून होऊ लागले. शाळेत शिकत असतानाच हिंदुस्थानातील क्रांतिकारकांच्या हालचालींची समग्र माहिती असलेला रौलॅट कमिशनचा अहवाल त्यांना वाचावयास मिळाला. अक्षरश: झपाटलेल्या अवस्थेत त्यांनी तो जाडजूड अहवाल संपूर्णपणे वाचून काढला. त्यातील स्वातंत्र्यवीर सावरकरांसंबंधीची रोमहर्षक माहिती त्यांनी वाचिली आणि त्या क्षणापासूनच ते स्वातंत्र्यवीर सावरकरांकडे ओढले गेले. त्यांच्या मनावरील स्वातंत्र्यवीर सावरकरांचा तेव्हा पडलेला प्रभाव उत्तरोत्तर वाढतच गेला. पुढे ते सावरकरांचे निष्ठावान अनुयायी बनले. निकटवर्ती बनले. अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी वीर सावरकरांच्या हिंदुत्ववादी राजकारणाचा पाठपुरावा केला. त्यासाठी त्यांनी अनेक दौरे काढले, असंख्य भाषणे दिली, लेख लिहिले. परिणामत: त्यांना राजकीय विजनवास व उपेक्षा या गोष्टी सहन कराव्या लागल्या, तरी त्यांनी त्याची यत्किंचितही क्षिती बाळगली नाही. अगदी लहान वयापासूनच रा. म. यांचं ‘केसरी’चं नियमीत वाचन चालू असल्याने त्यांच्यावर लोकमान्य टिळकांच्या जहाल राष्ट्रवादी विचारांचे संस्कार सातत्याने होत होते.

रामचंद्र  महादेव हे मॅट्रिकला असतानाच सन 1918 मध्ये त्यांना तो रौलॅट कमिशनचा अहवाल वाचावयास मिळाला. त्या वेळी स्वा. सावरकर अंदमानात जन्मठेपेची शिक्षा भोगीत होते. तेव्हाच रा. म. यांनी ‘सावरकर हेच माझे राजकीय गुरु व नेता’ असा मनोमन दृढ संकल्प सोडला. पुढे सहा वर्षांनी स्वा. सावरकरांची मुक्तता होताच त्यांच्या प्रत्यक्ष भेटीचा अपूर्व योग त्यांचे धाकटे बंधू डॉ. नारायणराव सावरकर यांच्या गिरगावातील तेव्हाच्या बिर्‍हाडी सन 1924 मध्ये आला. तो त्यांना जणू उत्तम प्रतिसादाचा शुभशकुनच वाटला.

इंटरच्या वर्गात असताना महात्मा गांधींनी असहकारितेचं आंदोलन छेडलं होतं. ‘एक वर्षात स्वराज्य’ही त्यावेळची त्यांची घोषणा होती. शाळा कॉलेजांवर बहिष्कार घालण्याचं विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात आलं होतं. त्याला प्रतिसाद देत रा. म. यांनी इंटरमधूनच कॉलेज शिक्षणास रामराम ठोकला. अर्थात त्या आंदोलनास यश लाभलं नाही. स्वराज्याची लढाई पुढे चालूच राहिली. पण रा. म. पुन्हा कॉलेजात मात्र गेले नाहीत. त्यांनी आपला व्यासंग स्वतंत्रपणे चालू ठेवला आणि अभ्यास-वाचन-मनन-चिंतन याद्वारे त्यांनी शिक्षण क्षेत्रात किंवा ज्ञानाच्या क्षेत्रात फार मोठा अधिकार प्राप्त केला. ते केवळ पढीक विद्वान नव्हते तर सर्वकाळ संशोधक, चिकित्सक विद्वान होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थी - विद्यार्थिनींनी उच्च गुणवत्तेसह पदव्या प्राप्त केल्या. रा. म. यांनी शिकवणीचे पैसे कोणाकडूनही घेतले नाहीत ही गोष्ट येथे विशेषत्वाने उल्लेखिली पाहिजे. कारण शिकवणीचे पैसे घेणे म्हणजे विद्या विकणे हे त्यांच्या तत्त्वात बसणारे नव्हते. विद्या ही पैसे घेऊन शिकवण्याची गोष्ट नव्हे असं त्यांचं ठाम मत होतं. त्यांनी खर्‍या अर्थाने आयुष्यभर काहीही हातचे न राखता ज्ञानदान केलं. ज्ञानदान हे सर्वश्रेष्ठ दान असेल आणि ते पुण्यप्रद असेल तर ते पुण्य रा. म. यांनी आयुष्यभर केलं आहे. रा. म. हे चालता-बोलता ज्ञानकोश होते. त्यांचा अनेकांनी उपयोग करून घेतला. पण ते स्वत: मात्र या व्यावहारिक जगात अपेशी ठरले, निष्कांचन राहिले. परंतु त्यांनी या गोष्टीची मुळीच खंत केली नाही. सरस्वतीच्या या निस्सीम उपासकाने लक्ष्मी मिळविण्याचा ध्यास कधीच धरला नाही आणि त्यासाठी त्यांनी कुणाची लाचारी वा मिंधेपण यत्किंचितही पत्करले नाही.

रा. म. यांना स्वातंत्र्यवीर विनायकराव सावरकरांप्रमाणेच सामुदायिक शुद्धि चळवळीचे प्रणेते विनायक महाराज मसूरकर देखील गुरुस्थानी होते. हे दोन ‘विनायक’ त्यांचे गुरु. मसूरकर महाराजांनी गोव्यात सन 1928 मध्ये घडवून आणलेल्या दहा हजार गावड्यांच्या सामुदायिक शुद्धीकरणाचे रा. म. हे प्रत्यक्ष साक्षीदार होते. तसेच स्वा. सावरकरांच्या रत्नागिरीतील सुप्रसिद्ध पतितपावन मंदिराच्या स्थापना सोहळ्यातील ते एक साक्षीदार होते. या दोन महापुरुषातील, या दोन विनायकांतील रा. म. हे एक महत्त्वाचा दुवा होते. गोमंतकातील त्या ऐतिहासिक सामुदायिक शुद्धिसमारंभावरील सावरकरांचा ‘गोमंतकाला विसरू नका’ हा ‘श्रद्धानंद’मधील लेख रा. म. यांना सावरकरांनी स्वत: सांगून लिहून घेतला होता. (डिक्टेट केला होता) ती महत्त्वाची आठवण रा. म. आठवले लिखित ‘बॅरिस्टर सावरकर : शलाका परिचय’ या पुस्तकात सविस्तर आलेली आहे. ‘मसुराश्रमा’च्या वतीने निघणार्‍या ‘श्रीदासबोध’ मासिकाचे (पडद्याआडून) संपादन रा. म. यांचे होते. मसुराश्रमाचे त्यांनी सहा वर्षे पूर्ण वेळ काम केले आहे.

रा. म. हे अधिकारी संशोधक होते. मराठीचे भाषाशास्त्र, संतवाङ्मय, पंतवाङ्मय, इतिहास व संस्कृत साहित्य हे त्यांच्या व्यासंगाचे विषय होते. त्यावर त्यांचे शेकडो संशोधनपर लेख प्रसिद्ध झाले आहेत. मोरोपंत, वामन पंडित किंवा कालिदास हे जसे त्यांचे संशोधनाचे, अभ्यासाचे अन् आवडीचे विषय तसेच ‘1857 चे क्रांतियुद्ध’ हा त्यांचा खास संशोधनाचा विषय. या विषयावरील शेकडो इंग्रजी ग्रंथ त्यांनी विकत घेऊन वाचले - अभ्यासिले होते. हे त्यांच्या ग्रंथ संग्रहावरून लक्षात येई. इतकंच नव्हे तर हिंदुस्थानभर स्वत: फिरून व संशोधन करून त्यांनी त्या विषयावर विपुल लेखन केलं आहे. 1857 च्या क्रांतियुद्धावरील एक अधिकारी संशोधक म्हणून त्यांची ख्याती होती. अगदी या युद्धापर्यंत मस्तानीपुत्र समशेर बहाद्दराचे वंशज पेशव्यांच्या मुख्य वंशजांशी एकनिष्ठ व बंधुवत् होते हे संशोधून ते अभिमानाने सांगत असत.

1857 च्या क्रांतियुद्धावर सविस्तर,साधार ग्रंथ लिहिण्याचा रा.म. यांचा मानस होता आणि त्या ग्रंथाची सिद्धता करण्यासाठी त्यांनी हिंदुस्थानभर प्रवास करून भरपूर दुर्मिळ माहिती, ऐतिहासिक संदर्भ, कागदपत्रे, चित्रे-रेखाचित्रे जमविलेली होती. प्रत्यक्ष स्वातंत्र्यवीर सावरकरांना देखील हा ग्रंथ प्रसिद्ध व्हावा असं मनापासून वाटत होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी व्यक्त केलेल्या इच्छेनुसार त्यांच्या ‘1857 चे स्वातंत्र्य समर’ या ग्रंथाची पहिली इंग्रजी आवृत्ती ‘केशव भिकाजी ढवळे’ प्रकाशनाच्या वतीने प्रसिद्ध झाली. तिच्यामध्ये  रा.म. यांच्या संग्रहातील अनेक चित्रे प्रसिद्ध करण्यात आली आणि त्याविषयी कृतज्ञतापूर्वक उल्लेख त्या ग्रंथाच्या प्रास्ताविक निवेदनातही केलेला आहे. रा.म. यांच्या या ‘सत्तावनी क्रांतियुद्धा’च्या विषयावरील संशोधनाविषयी व अधिकाराविषयी स्वत: स्वातंत्र्यवीर सावरकरांना विश्वास होता म्हणून ते अधून मधून या आगामी नियोजीत ग्रंथाविषयी आस्थेने चौकशीही करीत. अर्थात् या विषयावरील रा.म. यांचे संशोधनपर अनेक लेख प्रसिद्ध झाले असले तरी हा स्वतंत्र ग्रंथ मात्र प्रसिद्ध होऊ शकले नाही.
रा. म. यांनी ‘श्रीज्ञानदेवी’ मासिकाप्रमाणेच ‘कौस्तुभ’ हे अर्धवार्षिक काही काळ चालवून आपल्या संपादन कौशल्याचा प्रत्यय आणून दिला. रा. म. यांचा ऐन उमेदीचा व लेखनकर्तृत्वाचा सुमारे 30-35 वर्षांचा काळ ठाणे शहरात गेल्यामुळे लोक त्यांना ‘ठाण्याचे रा. म. आठवले’ म्हणून ओळखत. त्यांनी आपल्या प्रभावी नि पल्लेदार वक्तृत्वाने अनेक सभा-संमेलने गाजविली. अनेक साहित्यिक वादात हिरिरीने भाग घेतला. मराठी भाषाशुद्धीचे ते कडवे प्रचारक होते. आज सर्रास रूढ असलेल्या ‘विक्रम’, ‘ध्वनिक्षेपक’ या शब्दांची निर्मिती त्यांचीच. इंग्रजीतील ‘रेकॉर्ड’ या शब्दाला ‘विक्रम’ हा प्रतिशब्द कसा समर्पक आहे त्यासंबंधी त्यांचा एक स्वतंत्र लेखच प्रसिद्ध झाला आहे.

देशाला स्वातंत्र्य मिळालं. पण त्याच वेळी देशविच्छेदनाचं - फाळणीचं संकट आपल्या देशबांधवांवर कोसळलं. या प्रसंगी पाकिस्तानात झालेल्या भीषण दंगलींची, हिंदूंच्या शिरकाणाची वर्णने वृत्तपत्रांद्वारे प्रसिद्ध होऊ लागली, तशी येथील हिंदुत्वनिष्ठ जनतेतून संतापाची लाट उसळू लागली. स्वाभाविकपणेच रा. म. यांच्या जहाल व ज्वालाग्राही भाषणांना या काळात उधाण आलं. परिणामी त्यांच्यावर भाषण बंदी घालण्यात आली. कोणत्याही विषयावर व्याख्यानप्रवचनादी कोणत्याही माध्यमातून बोलण्यास त्यांना तत्कालीन शासनाकडून प्रतिबंध करण्यात आला. कारण रा. म. कोणत्याही विषयाचा वा माध्यमाचा आपले जहाल विचार व्यक्त करण्यासाठी वापर करतील याची पोलिसांना खात्री होती. देशाच्या दुर्दैवी फाळणीतून उद्भवलेल्या भीषण दंगलीत आपल्या प्राणास मुकलेल्या असंख्य हिंदू स्त्री-पुरुष बांधवांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मुंबई गिरगाव चौपाटीवर लोकमान्य टिळकांच्या पुतळ्यापाशी 15 ऑगस्ट 1947ला प्रगट समारंभ हिंदुत्वनिष्ठांनी आयोजित केला होता. त्यात रा. म. हे सहभागी झाले होते. त्या कार्यक्रमावर पोलीसांनी बंदी घातली. बंदी मोडल्यामुळे रा. म. यांना अन्य कार्यकर्त्यांसह अटक झाली आणि कारागृहात डांबण्यात आलं. सारा देश स्वातंत्र्योत्सव साजरा करीत असता हे देशभक्त कार्यकर्ते आपल्याच पोलिसांकडून घडवलेला तुरुंगवास भोगत होते. हा विरोधाभास मनाला चटका लावल्यावाचून राहात नाही.

रा. म. यांनी विपुल लेखन केलं. श्रीमद् भगवद्गीतेचा पहिला मराठी अवतार असलेल्या श्रीनिवृत्तिनाथांच्या ‘निवृत्तेश्वरी’ या महान् संशोधनपर ग्रंथाचे लेखन त्यांनी पूर्ण केले होते. त्याचप्रमाणे विशदार्थ दासबोध, विशदार्थ ज्ञानेश्वरी व गुरुचरित्र या ग्रंथांचेही लेखन त्यांनी पूर्ण केले होते. परंतु या ग्रंथांना प्रसिद्धीचा प्रकाश त्यांच्या हयातीत मिळू शकला नाही. हे ग्रंथ छापून प्रसिद्ध करणे हे लक्षावधी रुपयांचं काम आहे. तरी देखील ते एक राष्ट्रीय व समाजहिताचं काम आहे याची जाणीव शासनाला व सूज्ञ - समर्थ व्यक्तींना होणं आवश्यक आहे. या महान ग्रंथांच्या कुशाग्रबुद्धी लेखकाची - निर्मात्याची आयुष्यभर उपेक्षा झाली, पण त्यांनी लिहिलेल्या या मौलिक ग्रंथांची, साहित्याची तरी उपेक्षा होऊ नये ही इच्छा आहे.

रा. म. यांनी महाकवी नारायण रामचंद्र मोरे लिखित ‘शिवायन महाकाव्या’ला ‘ललकार’ नावाची 128 पृष्ठांची लिहिलेली प्रदीर्घ, अभ्यासपूर्ण प्रस्तावना विद्वन्मान्य झालेली आहे. त्यांनी विविध विषयांवर मौलिक लेखन एवढ्या विपुल प्रमाणात केलं आहे की त्यांची 10-12 तरी पुस्तके छापता येतील. अर्थात ते शक्य होईल त्याप्रमाणे करणे हेच पुढील पिढ्यांचं कर्तव्य ठरतं कारण तीच त्यांना उचित श्रद्धांजली होईल.

रा. म. आठवले यांचं ज्या दिवशी देहावसान झालं त्याच दिवशी दि. 31 डिसेंबर 1988ला त्यांनी आयुष्यभर पुरस्कारलेल्या हिंदुत्वाचा उच्चरवाने उद्घोष शिवसेनेच्या पुण्यातील राज्यव्यापी अधिवेशनात होत होता. ही रा. म. यांना काळपुरुषाने दिलेली जणू अभिनव मानवंदनाच होती !

शब्दांकन : क्रांतिसेन आठवले

‘‘सन 1937 मधील एक दुर्मिळ छायाचित्र - स्वातंत्र्यवीर सावरकरांसोबत रा. म. आठवले’’