जन्म: 1870
वंशावळ संदर्भ: सोमेश्र्वर 21
अत्यंत करारी स्वभावाच्या, स्वाभिमानी वृत्तीच्या, लहान वयातच वैधव्य वाट्याला आलेल्या, महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या निकटच्या सहकारी, त्यांनीच हिंगणे येथे स्थापन केलेल्या अनाथ बालिकाश्रमाच्या प्रमुख आधारस्तंभ, त्या संस्थेला देशातून नि परदेशातून सहस्त्रावधी रुपयांच्या देणग्या मिळविणार्या, त्यासाठी वर्षानुवर्षे अहोरात्र भ्रमंती करणार्या, अनेक संकटांवर यशस्वीपणे मात करून स्वत:च्या कार्याचा डोंगर उभा करणार्या आणि समाजसुधारकांना देखील दीपस्तंभ ठराव्यात अश्या श्रीमती पार्वतीबाई आठवले यांचा आठवले कुलातील प्रत्येकालाच अभिमान वाटेल. आठवले कुलाच्या त्या खर्या अर्थाने भूषण आहेत. श्रीमती पार्वतीबाईंनी सुमारे शंभर पृष्ठांचं ‘माझी कहाणी’ हे आत्मचरित्रात्मक पुस्तक लिहून फार मोठं काम केलेलं आहे. कारण त्यामुळेच त्यांच्या बहुमोल समाजकार्याचा महत्त्वाचा दस्तावेज आज आपल्याला उपलब्ध झालेला आहे. त्या आधारानेच आम्ही त्यांच्या जीवनकार्याचं थोडक्यात दर्शन या ठिकाणी आमच्या कुल बांधवांना घडवीत आहोत.
पार्वतीबाईंचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील देवरूख गावी सन 1870 मध्ये झाला. त्यांचे वडील बाळकृष्ण केशव जोशी. त्यांची देवरुखात स्वत:चं घर, शेतीवाडी होती. पार्वतीबाईंना एकूण अकरा भावंड. पण त्यातली चौघंच (तीन बहिणी व एक भाऊ) पुढे जगली व वाढली. त्यांची एक बहीण म्हणजे धोंडो केशव कर्वे यांची पत्नी आनंदीबाई. त्यांची दुसरी बहीण म्हणजे नाशिक हायस्कूलचे हेडमास्तर रामचंद्र काशिनाथ भिडे यांची पत्नी यशोदाबाई भिडे. मोठे बंधू नरहर बाळकृष्ण जोशी भावनगर येथे मुलाकडे जाऊन राहिलेले. ते वयाच्या 78व्या वर्षी निवर्तले. आई 75व्या वर्षी तर वडील 92व्या वर्षी दिवंगत झालेले. त्या काळी म्हणजे पार्वतीबाईंच्या लहान वयात देवरूखमध्ये मुलांचीसुध्दा शाळा नव्हती तर मुलींची कुठून असणार? त्या वेळी बायकांनी शिकावे की नाही याविषयी घरी चर्चाही होत नसे. त्यामुळे स्त्रीशिक्षणाचा तेव्हा प्रश्नही निर्माण झाला नव्हता. लहान मुलींना पूजेची तयारी करीता आली, तांदूळ कांडता येऊ लागले, उष्टे-खरकटे काढता येऊ लागले, लहान मुलांना आंघोळ घालून त्यांची खाण्यापिण्याची व्यवस्था करता येऊ लागली की स्त्रीचे शिक्षण पूर्ण झाले असा त्या वेळी समज असे. त्यावेळची मुलींची मॅट्रिक परीक्षा म्हणजे भात-पिठले करता येणे व दोघांचा स्वयंपाक करता येणे. पार्वतीबाईंना या गोष्टी वयाच्या अकराव्या वर्षीच येऊ लागल्या होत्या.
पार्वतीबाईंची आई अत्यंत कामसू. घरी सात-आठ मुले, दोन तीन गाई, तीन चार म्हशी असा सर्व व्याप होता. तो सर्व एकटी आई समर्थपणे सांभाळी. तर वडील बाहेरचा व्यवहार व शेतीवाडी सांभाळीत. ते नेहमी नामस्मरणात दंग असत. त्यांचे विचार व आचार सुधारकाला साजेसे असत. त्या काळी ते महार मांगांना प्यायला घरातलं माठातलं पाणी अगदी सोवळ्यात असले तरी अगत्यपूर्वक स्वत: नेऊन देत. महार मांगांसह आपण सर्वच जण रामाची लेकरं आहोत. त्यांचा आत्मा पाणी पिऊन थंड झाला की आमचं समाधान होईल ही त्यांची सुधारकी विचारसरणी आणि त्यानुसार आचरण. हेच संस्कार पार्वतीबाईंवर लहानपणीच झालेले होते.
त्या काळी मुलींची लग्नं पाचव्या वर्षापासूनच होत असत. पार्वतीबाई अकरा वर्षांच्या झाल्या तेव्हा आजूबाजूच्या बायका “किती मोठी झाली आहे लग्नाला !” असं म्हणू लागल्या. पार्वतीबाईंच्या भावाचे लग्न झाल्यावर वडील आजारी होते म्हणून त्यांना पार्वतीबाईंसाठी स्थळ पाहणे जमले नाही. पण तो योग पार्वतीबाईंच्या वयाच्या अकराव्या वर्षी आला. रत्नागिरीतील प्रसिद्ध ‘नऊ पटवर्धनां’पैकी एक भिकाजीपंत पटवर्धन हे त्यांच्या शेजारीच राहात होते. ते मामलेदार होते. त्यांच्या पत्नीच्या मध्यस्थीने त्यांच्याच आश्रयाला असलेल्या, गोव्याला कस्टम खात्यात नोकरी करणार्या, 15 रुपये पगार असलेल्या, एका पायाने अधू (लंगडा) असलेल्या मुलाबरोबर पार्वतीबाईंचं लग्न ठरलं. रामानेच (परमेश्वराने) धाडलेलं हे स्थळ अशी वडिलांची प्रतिक्रिया. अखेर सहा दिवसातच हे लग्न (पार्वतीबाईंना पसंत नसतानाही) पार पडलं आणि पार्वतीबाई गोव्याला पणजीजवळ वेरे गावी नवर्याच्या घरी (बिर्हाडी) रवाना झाल्या. पार्वतीबाई जोशी आता पार्वतीबाई आठवले झाल्या. पंधराव्या वर्षी त्यांना मुलगा झाला. पण तो अपुर्या दिवसांचा होऊन वारला. लहान वयातच बाळंतपण ओढवल्याने पार्वतीबाईंचे हाल झाले. नंतर त्यांना 18व्या वर्षी दुसरा मुलगा झाला, जो पुढे महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी स्थापन केलेल्या अनाथ बालिकाश्रम संस्थेचा आजन्म सेवक होऊन भारतवर्षीय महिलाविद्यापीठाचा रजिस्ट्रार व महिला पाठशाळेचा प्रिन्सिपॉल झाला. तो पदार्थविज्ञान शास्त्राचा प्रोफेसरही होता. त्याचं सर्व शिक्षण पार्वतीबाईंनी आपल्या हिंमतीवर पूर्ण केलं. कारण त्यांचे पती सन 1890 मध्ये उदर रोगाने वारले. आणि पार्वतीबाईंच्या नशिबी वयाच्या विसाव्या वर्षीच वैधव्य आलं. त्यांना माहेरीच वास्तव्य करावं लागलं. पार्वतीबाईंची मोठी बहीण ही रँग्लर परांजपे यांची सासू. सहा वर्षांपूर्वीच विधवा होऊन ती देखील माहेरीच आली होती. तर धाकटी बहीण नवव्या वर्षीच विधवा झाली होती. पुढे तिच्याशी महर्षी कर्वे यांनी पुनर्विवाह केला तीच बाया कर्वे. या विवाहानंतर पार्वतीबाईंच्याही आयुष्याला नवीन वळण लागले. या वेळी पार्वतीबाई पंचवीस वर्षांच्या होत्या. बायाच्या पुनर्विवाहाचा एक परिणाम म्हणजे देवरूखच्या माहेरच्या घरावर तत्कालीन समाजाने बहिष्कार टाकला. शेवटी गावच्या तीन देवळांच्या जीर्णोद्धाराकरिता वडिलांनी 100 रुपये दिल्यावर व ग्रामस्थांची क्षमा मागितल्यावर एक वर्षानंतर हा बहिष्कार उठला.
महर्षी कर्वे यांच्या मार्गदर्शनामुळे, मदतीमुळे व प्रोत्साहनाने पार्वतीबाईंच्या आयुष्याला वेगळे वळण लागले. त्यांच्यात सामाजिक जाणीव उत्पन्न होऊन अनाथ-विधवा स्त्रियांसाठी काम करण्याची अनावर ओढ निर्माण झाली आणि त्यांनी स्वत:चं ध्येय निश्चित करून पुढील संपूर्ण आयुष्यच त्यासाठी सर्वाथाने समर्पित केले. त्या अनाथ बालिकाश्रमाच्या आजन्म सेविका बनल्या.
धाकटी बहीण बाया हिच्या पुनर्विवाहामुळे पार्वतीबाईंना देवरूख सोडून पुण्याला येण्याची संधी मिळाली. त्यांनी तेथे शिक्षण प्राप्त केल्यामुळे नवीन विचारांची ओळख होऊन त्या भारून गेल्या. त्यांचा जणू पुनर्जन्म झाला. हिंदुस्थान देश म्हणजे काय, राष्ट्र म्हणजे काय व आपण राष्ट्रोद्धार करण्याकरिता काय केले पाहिजे, याविषयीच्या त्यांच्या कल्पना स्पष्ट होत गेल्या. विधवांच्या प्रश्नांसंबंधी, त्यांची स्थिती सुधारण्यासाठी तसंच केशवपनादी अनिष्ट रूढी घालविण्यासाठी, त्यासाठी होणारी सक्ती झुगारून देण्यासाठी कशा प्रकारे लढा दिला पाहिजे, कोणते प्रयत्न करावयास हवेत याविषयी त्यांनी मनाशी निश्चित आराखडे तयार केले. अनाथ बालिकाश्रमासाठी गावोगावी फिरून त्यांनी त्या काळी शेकडो रुपयांच्या देणग्या मिळविल्या. त्या काळात त्यांना वेगवेगळे अनुभव आले. अंतरीच्या उत्कट तळमळीमुळे त्यांचं वक्तृत्व प्रभावी व परिणामकारक होई. त्या श्रोत्यांची मने जिंकून घेत. अनेक सामाजिक परिषदांमधून त्यांनी भाग घेतला. प्रत्यक्ष कामाचा अनुभव देखील त्यांच्या गाठीशी भरपूर होता. विधवांची स्थिती समाजापुढे मांडून त्यांची उन्नती घडवून आणण्यासाठी त्या अक्षरश: झिजल्या. विधवांच्या वाट्याला येणार्या दयनीय अवस्थेचा त्यांना स्वत:लाच अनुभव असल्यामुळे त्यांच्या स्थितीविषयी बोलण्याचा त्यांनाच खरा अधिकार नव्हता का ? त्यांनी भारतातील विविध राज्यांतून केलेल्या भ्रमणाद्वारे त्यांचा अनेक विधवा व अनाथ स्त्रियांशी संपर्क आला, त्यांच्या अडचणी समजून घेता आल्या आणि त्या निवारण्यासाठी विविध उपायही त्यांनी योजिले. केशवपनाच्या अनिष्ट रूढीच्या स्वत: पार्वतीबाईदेखील एक बळी होत्या. त्यांनी स्वत: केस वाढवून या चालीला आळा घातला. त्यासाठी त्यांनी त्या वेळच्या रूढीप्रिय समाजाकडून कुचेष्टा, तर्कवितर्क व निंदा यांना तोंड दिलं. त्या स्वत:च्या विचारांवर व आचरणावर ठाम राहिल्या.
पार्वतीबाईंनी पुढाकार घेऊन त्यांच्या मुलाचा - नानाचा विवाह सन 1915 मध्ये त्याच्या वयाच्या 27 व्या वर्षी त्यांच्या परिचयातल्याच श्री. जोशी यांच्या 21 वर्षीय सई नावाच्या मुलीबरोबर लावून दिला. माहेरची सई जोशी आता लग्नानंतर सुशीला आठवले बनली. एका मोठ्या जबाबदारीतून त्या मोकळ्या झाल्या व पुन्हा आश्रमाच्याच कार्याला स्वत:स पूर्णपणे जुंपून घेतलं. 42व्या वर्षी त्या वांदर्याच्या कॉन्व्हेंट शाळेत जाऊन इंग्रजी शिकल्या. इतकंच नव्हे तर वयाच्या 45व्या वर्षी त्या अण्णासाहेब कर्वे यांच्या आग्रहामुळे व प्रोत्साहनामुळे अमेरिकेला रवाना झाल्या. हा खरं तर फार मोठा चमत्कारच होता. (तिकडे धर्मानंद कोसंबी यांची त्यांना खूप मदत झाली.) पी. अॅन्ड ओ. कंपनीच्या बोटीने त्या मुंबईहून हाँगकाँग व तेथून पुढे सॅन्फ्रान्सिस्को येथे अनेक दिवसांचा प्रवास करीत पोचल्या. अमेरिकेसारख्या परकी देशात गावोगावी त्यांना आलेले विलक्षण अनुभव आणि त्यांनी मोठ्या चिकाटीने तेथे केलेलं कार्य त्यांच्या ‘माझी कहाणी’या आत्मचरित्रात्मक मूळ पुस्तकातून वाचणे उद्बोधक व मनोरंजक ठरेल. तिकडे त्यांनी वेगवेगळ्या कुटुंबातून स्वयंपाकिणीचे काम केले, ते सांभाळून अनेक व्यक्ती, संस्था यांना भेटून आपलं हिंदुस्थानातील ‘अनाथ बालिकाश्रमा’चं कार्य समजावून देत. त्याकरिता देणग्या गोळा केल्या. वॉशिंग्टनमध्ये सन 1919 मध्ये भरलेल्या आंतरराष्ट्रीय मजूर परिषदेत त्यांनी हिंदी स्त्री मजुरांच्या प्रतिनिधी म्हणून भाग घेतला, इतर समारंभातून वेळोवेळी विविध संस्था-क्लब यांच्या शेकडो सभासदांपुढे भाषणे करून महर्षी कर्वे यांच्या स्त्रीशिक्षण प्रसाराच्या व हिंगण्याच्या संस्थेची माहिती देऊन त्यासाठी त्यांनी अनेक देणग्या गोळा केल्या. पाच वर्षांच्या अमेरिकेतील वास्तव्यात पार्वतीबाईंनी आश्रमासाठी हजारो रुपयांच्या देणग्या मिळविल्या आणि 20 एप्रिल 1920ला फाईव्हस्टार लाईनच्या ‘ऑलिंपिक’ बोटीने अमेरिकेहून स्वदेशी परतण्यासाठी निघाल्या व 15 जुलैला मुंबईस पोहोचल्या. पार्वतीबाईंना पॅरिस येथे डॉ. रवींद्रनाथ टागोर यांच्या भारत वासियांनी केलेल्या समारंभास उपस्थित राहण्याचं व त्यांचं भाषण ऐकण्याचं भाग्य लाभलं. इतकंच नव्हे तर त्यांना डॉ. रवींद्रनाथ टागोर व त्यांची सून यांच्याबरोबर मार्सेलिस ते मुंबईपर्यंत एकाच बोटीने 2 ते 15 जुलै प्रवास करण्याचा सुयोग प्राप्त झाला. त्यांच्याबरोबर काव्य-शास्त्र-विनोदांत तासन्तास वेळ आनंदात गेल्याचं त्यांनी लिहिलं आहे.
पार्वतीबाईंचे येथील समाज परिस्थितीसंबंधी विवाहपद्धतीविषयी, कुटुंब व्यवस्थेविषयी व एकूण समाजोन्नती विषयी विशेषत: अबलोन्नती विषयी स्वत:चे स्वतंत्र व सडेतोड विचार होते. ते त्या प्रसंगानुसार स्पष्टपणे व निर्भीडपणे मांडीत. हिंदुस्थानातील स्त्रीशिक्षणाला राष्ट्रीय वळण देण्याचा त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केला. ‘केसरी’कारांनी देखील त्यांच्या कार्याची विशेष दखल घेऊन त्यांच्याविषयी अत्यंत गौरवाने लिहिले आहे. सामाजिक परिषदेतील पार्वतीबाई आठवले यांच्या स्पष्ट व सडेतोड भाषणाविषयी ‘केसरी’कारांनी म्हटले आहे की, “सुधारणा ही इंग्रजी पेहरावात किंवा इंग्रजी थाटात नाही तर ती कृतीमध्ये आहे व अभागी स्त्रियांनी होता होईल तो संन्यासवृत्ती स्वीकारूनच आपल्या जीविताचे सार्थक करावे. असा जो श्रीमती पार्वतीबाईंनी आपल्या भगिनींस उपदेश केला तो जरी काही सुधारकांस पसंत पडला नाही. तरी सर्व समंजस आणि विचारी गृहस्थांना त्यातील सत्य व रहस्य ‘यावच्चंद्रदिवाकरौ’ मान्य झालेच पाहिजे.” पार्वतीबाईंचा ‘केसरी’कारांनी केलेला हा गौरव योग्यच असून त्याद्वारे पार्वतीबाईंच मोठेपण व असामान्यत्व सिद्ध होत आहे.
पार्वतीबाईंनी आपलं आत्मचरित्रात्मक ‘माझी कहाणी’ हे पुस्तक स्त्रियांच्या व विशेषत: विधवांच्या उन्नतीसाठी खटपट करणार्या सर्व बंधु-भगिनींस अर्पण करून त्यांच्याविषयी आदर व प्रेम व्यक्त केले आहे. पार्वतीबाई आठवले यांच्यासारखी असामान्य धडाडीची बावन्नकशी अस्सल समाजसेविका पुढील पिढ्यांना सदैव आदरणीयच राहील.
शब्दांकन : क्रांतिसेन आठवले