नारायण विष्णु आठवले


स्वातंत्र्यप्रेमी बंडखोर व्यक्तिमत्त्व
जीवनकाल: 1909 ते 2006
वंशावळ संदर्भ: सोमेश्वर 22

प्रखर देशभक्ती आणि निरपेक्ष सेवावृत्ती यांचा मनोज्ञ संगम झालेले बंडखोर व्यक्तिमत्त्व म्हणून नारायण विष्णु आठवले यांचा अभिमानपूर्वक उल्लेख करावा लागेल. रायगड जिल्ह्यातील (पूर्वीचा कुलाबा जिल्हा) खालापूर तालुक्यातील ‘आतकर गाव’ या छोट्याशा खेडेगावात दिनांक 7 मार्च 1909 ला श्री. ना. वि. यांचा जन्म झाला. वास्तविक ना. वि. यांचं कुटुंब सधन होतं. परंतु लहान वयातच आईवडिलांचं छत्र हरपल्यामुळे ते पोरके झाले. ते अवघे पाच वर्षांचे असतानाच सन 1913 मध्ये आलेल्या प्लेगच्या साथीने त्यांच्या आई वडिलांचा बळी घेतला. तर काकांच्या स्वार्थी कारवायांमुळे ना. वि. यांना घरून कोणताच आधार मिळाला नाही. त्यामुळे त्यांना सन 1923 मध्ये वयाच्या 13व्या वर्षी स्वत:चे वडिलोपार्जित उत्तम स्थितीतले घर सोडावे लागले. घर सोडून ते आपल्या आजोळी सांगलीला आले. तेथे त्यांचे मामा एक बडे आसामी होते. ना. वि. यांना मामाचा आधार लाभला. वास्तविक ना. वि. यांचे वडील विष्णुपंत हे सुधारक वृत्तीचे. स्पृश्य-अस्पृश्य हा भेद न पाळणारे. महार-चांभार यांना अनेक परींनी सतत मदत करणारे. त्यामुळे ना. वि. यांचे मामा म्हणजेच वडिलांचे मेहुणे यांचे त्यांच्याशी पटत नसे. त्यांना वाळीत टाकण्याची धमकी मिळत असे. अखेर वडिलांनी सांगली सोडण्याचा निर्णय घेऊन ते आपल्या कुटुंबियांसह रायगड जिल्ह्यात आतकर गावी येऊन राहिले. पण दैवाचा फेरा असा की पुढे त्यांच्या मुलावरच (ना. वि. यांच्यावर) आतगाव सोडून सांगलीला मामांच्या आश्रयास येण्याची वेळ आली.

नारायणरावांनी शालेय शिक्षण सांगलीला पूर्ण केले. तेथे तेव्हा कॉलेज नसल्याने कोल्हापूरातील राजाराम कॉलेजात दाखल होऊन तेथून ते सन 1935 मध्ये बी. एस्सी. ही पदवी परीक्षा उत्तीर्ण झाले. पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या मुलास त्या काळी चांगल्या पगाराची खासगी किंवा सरकारी नोकरी मिळणे सहज शक्य होते. परंतु नारायणरावांची वृत्ती नोकरी करण्याची नव्हती तर स्वत:चा स्वतंत्र व्यवसाय करावा याकडे त्यांचा ओढा होता. त्यांचे एक मेहुणे सांगलीला होते. त्यांच्याकडून त्यांना तेव्हा साठ रुपयांची मदत मिळाली. त्या पैशात त्यांनी परदेशात प्रसिद्ध होणारी पुस्तके-मासिके विकण्याचा उद्योग पुण्याच्या प्रसिद्ध लक्ष्मी रोडवर प्रथम रस्त्याच्या कडेलाच सुरु केला. काही दिवसांनी त्यांचे एक सुहृद श्री. आगाशे यांनी आपल्या घराची पडवी नारायणरावांना पुस्तके विकण्यासाठी काहीही भाडे न आकारता उपलब्ध करून दिली. पुढे या पुस्तक विक्रीच्या धंद्याला - व्यवसायाला नारायणरावांनी त्याचा अधिक मोठ्या जागेत विस्तार करीत समाजात प्रतिष्ठा मिळवून दिली. श्री. आगाशे यांच्या पुढील पिढ्यांशीदेखील नारायणरावांचे अगदी जिव्हाळ्याचे संबंध होते.

दुसरे महायुद्ध सुरु झाल्यावर त्याचा नारायणरावांच्या पुस्तक विक्रीच्या या धंद्यावर विपरीत परिणाम होऊ लागला. परदेशातून येणारी मासिके-पुस्तके बंद झाली. धंद्यामध्ये तोटा येऊ लागला. अखेर नाइलाजाने हा व्यवसाय त्यांना बंद करावा लागला.
पण या महायुद्धाच्या धामधुमीच्या काळात नारायणरावांपुढे नोकरीची एक चांगली संधी चालून आली. पुण्याजवळील देहू रोड येथील दारू-गोळ्याच्या कोठारात त्यांना नोकरी मिळाली.

दरम्यान नारायणरावांची मामेबहीण कु. इंदुमती गोखले हिच्याशी जून 1939 मध्ये त्यांचा विवाह झाला. पदवीधर असलेला मुलगा नोकरी न करिता पुस्तक-विक्रीचा व्यवसाय रस्त्याच्या कडेला सुरू करून बेभरवंशी जीवनक्रम अनुसरतो पण तरीही त्या मुलाशी विवाह करण्याचा निश्चय करून त्याच्यामागे ठाम उभं राहण्याचा कु. इंदुमतीचा निर्णय खरोखरच धाडसाचा व कौतुकास्पद म्हणावयास हवा. परिचारिकेचा अभ्यासक्रम पूर्ण केलेली इंदुमती नारायणरावांशी विवाहबद्ध झाली आणि पुण्याच्या ससून रुग्णालयात 34 वर्षे परिचारिकेची नोकरी करून नारायणरावांच्या संसाराला तिने भक्कम आर्थिक पाठबळ दिले आणि त्यांचा संसार यशस्वी केला. कर्तृत्ववान, बुद्धिमान आणि पराक्रमी पुरुषाच्या यशस्वी जीवनाची प्रमुख भागीदार त्याच्यामागे समर्थपणे साथ देणारी त्याची सहधर्मचारिणी - पत्नी असते ही गोष्ट नारायणरावांच्या पत्नीने - इंदुमती - हिने आपल्या उदात्त वर्तनाने सिद्ध केली.

नारायणरावांना देहू रोड येथील लष्कराच्या दारू गोळा गोदामात नोकरी मिळाली खरी. पण पुढे तीच त्यांच्यावर कोसळलेल्या संकटांना कारणीभूत ठरली. कारण ब्रिटिश राज्यकर्ते त्यांच्या येथील रयतेवर अविश्वास दाखवितात ही गोष्ट नारायणरावांच्या त्या नोकरीच्या ठिकाणीच प्रत्ययास आली. सैनिकांना दिलेली बंदूक व काडतुसे एकमेकांना जुळत नाहीत ही गोष्ट नारायणरावांच्या ते शास्त्र शाखेचे पदवीधर असल्याने लक्षात आली. सरकारने केवळ दाखविण्याकरिता सशस्त्र असल्याची सैनिकांची समजूत करून दिली, पण प्रत्यक्षात त्या शस्त्राचा कोणताही उपयोग करिता येऊ नये अशी प्रत्यक्ष योजना होती. नारायणरावांनी ही गोष्ट - सरकारचा हा कुटिल डाव - संबंधित कर्मचार्‍यांच्या व सैनिकांच्या समर्थपणे पटवून लक्षात आणून दिला. नारायणरावांचा मूळ पिंड देशभक्ताचा. त्यामुळे परकी ब्रिटिश सरकारविरुद्ध त्यांच्या मनात असंतोष होताच. पण ते सारासार विचार करणारे असल्यामुळे पाच-पन्नास ब्रिटिश अधिकारी मारून ब्रिटिश सरकार येथून जाणार नाही. उलट त्यांचे येथील अत्याचार वाढतील, त्याऐवजी आपल्या ताब्यात असलेले स्फोटक साहित्य कुणाच्याही हाती न लागू देता आपण स्फोट करून ते नष्ट केल्यास त्यायोगे सरकारचे नुकसान करणे अधिक योग्य होईल हा विचार नारायणरावांनी मनाशी पक्का केला. त्यानुसार नारायणरावांनी हाताखालच्या काही कर्मचार्‍यांना व सैनिकांना फितवून त्यांचे सहकार्याने त्या काळी गोदामातील सुमारे एक कोटी रुपये किंमतीचा दारूगोळा स्फोट करून निकामी केला. यामध्ये नारायणरावांची दूरदृष्टी दिसून येते. परंतु दुर्दैवाने त्याच सुमारास पुण्यातील सुप्रसिद्ध कॅपिटॉल थिएटरमध्ये स्फोट घडवून आणून ब्रिटिशांचे पाच-पंचवीस अधिकारी मारण्याचा प्रयत्न झाला होता. त्या स्फोटासाठीचे साहित्य दारुगोळ्याच्या गोदामातून नारायणरावांच्या हाताखालच्या लोकांच्या अनवधानाने पुरविले गेले होते. अर्थात् त्यामुळे ब्रिटिश सरकारला त्याचा धक्का न बसता ते आणखी अत्याचारास प्रवृत्त होईल ही नारायणरावांना खात्री असल्याने त्यांनी एका जबाबदार व्यक्तीकडे त्या प्रकाराविषयी आपली नापसंती व्यक्त केली होती.

याच सुमारास महात्मा गांधींनी ‘छोडो भारत’ची हाक देशाला देऊन स्वातंत्र्यलढ्याला नवीन वळण लावले होते. त्यांनी बारा कलमी कार्यक्रम देशबांधवांपुढे ठेवला. त्यात एक कलम असं होतं की ब्रिटिश सरकारच्या नोकरीतील लोकांनी आपली नोकरी न सोडता नोकरीच्या ठिकाणीच राहून शक्य त्या सर्व जागी घोटाळे निर्माण करून ब्रिटिश सरकारच्या युद्धप्रयत्नांना खीळ घालावी व अडथळे निर्माण करावेत. या कलमामुळे श्री. नारायणराव आठवले यांचा हुरूप वाढला. त्यांना देशकार्याची एक नवी दिशा मिळाली. त्यामुळे त्यांनी शक्य तितके नामानिराळे राहून त्या गोदामातून ब्रिटिश व दोस्त राष्ट्रांच्या युद्ध भूमीवर जाणार्‍या दारूगोळ्याच्या सामानात जितका गोंधळ निर्माण करता येईल तितका प्रयत्नपूर्वक केला. या प्रयत्नांमध्ये नारायणरावांना त्यांच्यासमवेत व हाताखाली काम करणार्‍या लोकांनी स्वेच्छेने दिलेलं सहकार्य नि साथ खूपच मोलाची होती.

अर्थातच ब्रिटिश सरकार काही झोपलेले नव्हते. कॅपिटल थिएटर मधील सुप्रसिद्ध बॉम्ब स्फोट खटल्यात नारायणराव एक आरोपी म्हणून पकडले गेले. इतकंच नव्हे तर त्या खटल्यात त्यांना गुन्हेगार ठरवून देहान्ताची शिक्षा पुकारली गेली. त्यांना फाशी दिलं जाणार हे नक्की झालं. परंतु इथेही त्यांच्या पूर्वजांची नि पत्नीची पुण्याई त्यांच्या कामी आली. शिक्षा देण्याच्या पद्धतीतील काही तांत्रिक दोषामुळे त्यांची फाशी अंमलात येऊ शकली नाही. फाशी टळली तरी 1939 ते 1943 असा साडेचार वर्षांचा कारावास मात्र त्यांना भोगावा लागला. नारायणराव आठवले यांचा ब्रिटिश अधिकार्‍यांनी एवढा धसका घेतला होता की त्यांना कोणत्याही एका तुरुंगात तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ ठेवायचे नाही अशी सक्त ताकीद तुरुंगाधिकार्‍यांना दिली होती.
नारायणरावांच्या तुरुंगातील विधायक कार्याद्वारे त्यांच्या विधायक दृष्टिकोनाचे दर्शन तुरुंगाधिकार्‍यांना सतत घडत असे. त्यांनी त्यांच्याशी चांगले संबंध प्रस्थापित केले होते. तुरुंगातील विविध कैद्यांच्या मुलाखती घेऊन त्यांची गार्‍हाणी - तक्रारी नारायणरावांनी तुरुंगाधिकार्‍यांसमोर लिखित स्वरूपात मांडल्या व त्यांचे प्रश्न सोडविण्यात यशस्वी योगदान दिले.

नारायणरावांची कारागृहातून मुक्तता झाल्यानंतर ते स्वस्थ बसले नाहीत. ते शास्त्राचे पदवीधर होतेच. त्या काळात भारतात कपडे रंगविण्याचे पक्के सिंथेटिक कलर्स बनविण्याचे ज्ञान फारच थोड्या लोकांना होते. नारायणरावांना ते ज्ञान असल्यामुळे त्यांनी ती संधी साधली. ते मुंबईस गेले. तेथे त्यांनी राहत्या घरातच एक प्रयोगशाळा सुरु करून असा रंग भारतात प्रथमच तयार केला. प्रसिद्ध उद्योगपती श्री. अरविंद मफतलाल यांना हे संशोधन आवडल्याने त्यांनी नारायणरावांना भरपूर आर्थिक मदत केली. इतकंच नव्हे तर रंग तयार करण्याचा कारखाना सुरु करून त्याच्या प्रमुखपदी नारायणरावांची नेमणूक केली. काही काळ त्यांनी तेथे काम केल्यावर आपल्या निरीच्छ स्वभावामुळे आणि तरुणांना संधी देण्याच्या प्रवृत्तीमुळे त्यांनी ते भरपूर उत्पन्नाचे पदही सोडले. इतकेच नव्हे तर त्यांनी थोडा वेळ सल्लागार म्हणून काम करून भल्या मोठ्या रकमेचे मानधनही घेण्याचे नम्रपणे नाकारले.

नारायणरावांची ही असामान्य जीवनगाथा चालूच आहेत. आज ते शंभरीच्या जवळ आले आहेत. वयोमानानुसार गात्रे थकली आहेत. त्यांच्या मनात स्वातंत्र्यवीर सावरकरांसारखे प्रायोपवेशनाचे विचार अधून मधून येतात. या विषयावर त्यांची स्वातंत्र्यवीरांबरोबर चर्चाही झाल्याचं ते सांगतात. पण सुदृढ शरीर व मन प्रायोपवेशनास साथ देईल की नाही याची शंका वाटल्याने त्यांनी तो विचार सोडून दिला. भारताला स्वातंत्र्यप्राप्ती झाली. त्या चळवळीत आपलं अल्प योगदान देता आलं याचं नारायणरावांना समाधान आहे. त्यातच आपल्या जीवनाचं सार्थक झालं असं ते मानतात.

देशभक्त नारायण विष्णु आठवले यांना त्यांच्या असामान्य कार्यासाठी विनम्र अभिवादन !
शब्दांकन : क्रांतिसेन आठवले