भक्तजनांवर देवीची कृपा रहावी, सुखसमृद्धीची वृद्धी व्हावी, आरिष्ट टळावे याकरिता अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंत नवरात्र करण्याची प्रथा आहे.
अष्टभुजा देवीने महिषासुर दैत्याचा वध करुन भक्तजनांना आश्रय दिले. त्यांचे रक्षण केले. हे युद्ध नऊ दिवस चालले होते अशी आख्यायिका आहे. अश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापना करतात. प्रथम घरातील देवांची पूजा करुन घट बसवावा.
एक छोटा पाट घेऊन त्यावर गहू पसरुन त्यावर पाण्याने भरलेला तांब्या ठेवावा. पाण्यामध्ये नाणे व सुपारी ठेवावी. या तांब्यावर एक ताम्हन ठेवून त्यावर गहू पसरावेत व त्यावर देवीचा टाक ठेवावा. काही ठिकाणी ताम्हन व देवीचा टाक न ठेवता तांब्यावर नारळ ठेवतात. नारळ ठेवताना आंब्याची पाने बाजूने लावावीत. पाटापुढे शंख व घंटा ठेवावी व हळदकुंकू, अक्षता, गंध, फूल यांनी पूजा करावी. वासाच्या फुलांची माळ करुन त्यावर सोडावी. याप्रमाणे नऊ माळा घालाव्यात. एखाद्या तिथीचा क्षय असेल तर त्या दिवशी दोन माळा सोडाव्यात.
या दिवशी गव्हाचे महत्त्व असते. त्यामुळे पाटापुढे पत्रावळ ठेवून त्यावर चाळलेली माती घालावी. त्यात गहू पेरून पाणी घालावे. त्याप्रमाणे काही ठिकाणी इतर धान्ये ही पेरतात.
नवरात्रात नऊ दिवस चोवीस तास समई तेवत ठेवावी. ललितापंचमीला घटावर सायंकाळी पापड्या, करंज्या, गोड वडे यांचा फुलोरा टांगतात. काही घरात अष्टमीच्या दिवशी देवीसमोर होम करतात. नवमीपर्यंत दुर्गापाठ, सप्तशतीपाठ किंवा भागवताचे वाचन करतात.
तसेच काही घरात रोज सोवळ्याने स्वयंपाक करुन नऊ दिवस सवाष्ण व ब्राह्मणभोजन असते.
नवरात्र उठते वेळी प्रथम देवीची पूजा करुन घटाला माळ घालून आरती करावी. नंतर माळा उतरवाव्यात. ताम्हनातील देवीच्या टाकाची देवांत स्थापना करावी व पूजा करावी.
जेवावयाचा नैवेद्य दाखवून पुरणाचे दिवे करुन आरती करावी. पुरणाचे दिवे नऊ, सात किंवा पाच करतात. त्यामध्ये एक दिवा मोठा करतात. मोठ्या दिव्यात पाच वातींचा जुडगा घालावा.
नवरात्रात रोज संध्याकाळी देवीची आरती करतात व त्यावेळेस दूध साखरेचा किंवा एखाद्या फळाचा नैवेद्य दाखवून तो प्रसाद सर्वांना देतात.
एकदा घट बसविल्यावर नऊ दिवस तो हलवू नये व तसेच नंदादीपसुद्धा जागेवरुन हलवू नये. काही ठिकाणी पत्रावळीवर तयार केलेल्या शेतात घट बसवतात.