गौरी-गणपती


भाद्रपद महिन्यात अनुराधा नक्षत्रावर गौरी आणतात. नदीकाठचे किंवा पाणवठ्याजवळचे पाच खडे गौरी म्हणून आणतात व पूजा करतात. दुसऱ्या दिवशी ज्येष्ठा नक्षत्रावर घावन घाटल्याचा नैवेद्य दाखवितात व सवाष्ण जेवायला घालतात. तिसरे दिवशी नदी किंवा पाणवठ्यावर विसर्जन करतात.

भाद्रपद शुद्ध चतुर्थी, विनायकी चतुर्थी हा दिवस गणेश चतुर्थी म्हणून संपूर्ण भारतभर खाजगी व सार्वजनिक सण म्हणून साजरा केला जातो.

गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी श्री गणेशाची पार्थिव मूर्ती आणून दुसरे दिवशी तिची प्राणप्रतिष्ठा व पूजा केली जाते व नंतर दीड दिवस, ५  दिवस, ७ दिवस, ९ दिवस, १० दिवस किंवा अनंत चतुर्दशीपर्यंत पूजा करुन पार्थिव मूर्तीचे विसर्जन केले जाते. काही कुटुंबांमध्ये गौरी व गणपती यांचे एकाच वेळी विसर्जन केले जाते.

गणपती आणायला जाताना ताम्हन, रेशमी वस्त्र बरोबर घेऊन जावे. गणपतीची मूर्ती आणताना मूर्तीकाराकडून मूर्ती घेतल्यावर ताम्हनामध्ये ठेवताना तोंड आपल्याकडे करावे व पुढे नाणी व गोविंद विडा ठेवावा.

घरात प्रवेश करताना ज्या व्यक्तीच्या हातामध्ये श्री गणेशाची पार्थिव मूर्ती असेल त्याचे पायावर पाणी व दूध घालावे. तांदूळ व पाणी ओवाळून ते बाहेर टाकून द्यावे व नंतर आत प्रवेश करावा.

गणपतीची स्थापना गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी स्वत: किंवा ब्राह्मणाद्वारे करुन यथासांग प्रतिष्ठापना व षोडशोपचारे पूजा, आरती व नैवेद्य करावे.

दुपारी उकडीचे मोदकांचा नैवेद्य दाखवावा. रोज सकाळी व संध्याकाळी गणपतीची पूजा व आरती करावी. आरती नंतर प्रसादासाठी सहसा साखर, खोबर्‍याचे पंचखाद्य व ऋतुकाळाप्रमाणे असलेली फळे द्यावी.

विसर्जनाच्या दिवशी उत्तर पूजा करुन गणपती मूळ जागेवरुन हलवावा व ताम्हनात नेऊन ठेवावा. विसर्जनाच्या वेळी गणपतीचे मुख समोर व पाठ आपल्याकडे असे ठेवून, नजिकच्या पाणस्थळावर विसर्जनासाठी न्यावे. तेथे पुन्हा आरती करावी.

विसर्जनाच्या वेळी, पाणस्थळाच्या काठावर आरती व पाण्यामध्ये विसर्जन करताना तीन वेळा मूर्ती पाण्यात बुडवून वर काढावी व नंतर विसर्जन करावे.