बोडण
‘बोडण’ हा एक हिंदू चित्पावन कोकणस्थांतील कुलधर्म, कुलाचार आहे. आपल्या कुळातील चालीप्रमाणे म्हणजेच पारंपारिक वार्षिक, त्रैवार्षिक अगर शुभकार्य झाल्यावर बोडण भरतात. बोडण हे शक्यतो मंगळवारी, शुक्रवारी अथवा रविवारी भरतात. चातुर्मास पौष व चैत्र महिना सोडून हा देवीचा धार्मिक कार्यक्रम करतात. तीन किंवा पाच सुवासिनी व एक कुवारीण यांना तेल शिकाकाई देऊन, सुस्नान होऊन सोवळ्याने म्हणजे रेशमी वस्त्र नेसून सर्व सौभाग्य अलंकार लेवून येण्यास सांगितले जाते. सर्वांचे पाट गोलाकार मांडून मधोमध एक पाट अगर चौरंग ठेवून त्याखाली ठराविक पद्धतीचीच रांगोळी काढायची असते. बोडण भरण्यास पितळी परातच लागते. ती चौरंगावर ठेवतात. आल्याबरोबर सुवासिनींची व कुवारणींची तुळशीपुढे पूजा होते. प्रथम तुळशीची पूजा, ओटी व नंतर आलेल्या महिलांची व कुवारणींची गरम पाणी व दूध पायावर घालून ओटी भरतात. त्यानंतर लगेच त्या बोडण भरण्यास बसतात. आपल्या देवघरातील अन्नपूर्णा काढून ती बोडणाच्या परातीत ठेवतात तिची पूजा करण्याआधी प्रथम सुपारीचा गणपती करुन त्याची कणकेचे पाच छोटे छोटे दिवे आरतीसाठी करतात. देवीची घरच्या मालकिणीने पंचामृती पूजा करायची असते. देवीभोवती पुरणपोळीवर सर्व पदार्थ वाढून पांच नैवेद्य मांडले जातात. यावेळी नैवेद्य पुरण घातलेच पाहिजे. नैवेद्य दाखवून कणकेच्या दिव्यांनी दुर्गादेवीची आरती म्हणायची. नंतर ते पांच दिवे परातीत प्रत्येक नैवेद्याजवळ ठेवायचे. घरातील दुसर्या बाईने चांदीच्या संध्येच्या पळीस सोन्याची साखळी गुंडाळून त्याने दूधाची धार सोडून ते शांत करायचे असतात. या पूजेसाठी जसे पुरण हवे तसे पंचामृत (दूध, दही, तूप, मध, साखर) एक ते दोन भांडी तरी हवेच. दिवे शांत झाल्यावर देवीवर पाच पाच पळ्या प्रत्येकी दूध दही वगैरे घालायचे. घरच्या मालकिणीने सर्वांचे हात बोडण कालवण्यास लावावे. आपण बोडण कालवण्यास सुरुवात करावी. कुवारिण उदंड म्हणेपर्यंत हे पंचामृत क्रमाने किंवा ती जो पदार्थ सांगेल तो अधिक घालावा. कुवारणीने देवी, पैसा सुपारी त्या बोडणातून काढावी. देवीच्या तोंडास पुरण किंवा साखर लावून देवी देवघरात ठेवावी. पुरण सवाष्णीच्या हातास लावून त्यांचे हात थांबवावेत. परातीतील बोडण चमचाभर काढून घेऊन सर्व माणसांना अंगारा म्हणून लावतात. ते बोडण नंतर डब्यात, पातेल्यात घालून गाईस खायला घालतात. ते इतर कोणत्याही जनावरास घालायचे नसते तसेच टाकून द्यायचे नसते. बोडण हा धार्मिक कुलाचार चित्पावन ब्राह्मणांमध्ये असून इतर कोणत्याही ब्राह्मण पोटजातीत तो आढळत नाही. देवीने महिषासुरासारख्या अनेक राक्षसांचा नाश समुद्रकाठच्याच परिसरात केला आहे. त्यावेळी तिला अनेक रुपे धारण करावी लागली. राक्षसांना आटोपणे हे काम अतिशय ताकतीचे व बुद्धीचे होते ते देवीने करुन समाजाची त्रासातून सुटका केली. दैवी सुख समृद्धीचा लाभ तिच्यामुळे मिळाला म्हणून तिला शांत व प्रसन्न करण्यासाठी तिची ही पूजा. भक्तीभाव अर्पण करण्याचा हा सोहळा आहे. तिच्या कृपेने सर्व खाद्यपदार्थ, अलंकार व वनवैभव यांची रेलचेल आहे व होणार याचे हे प्रतीक आहे. या परंपरेमध्ये अंधक्षध्दा, उधळमाधळ, बेफिकीरी, सोवळ्याचा बहिष्कार असे अजिबात नाही. उलट वैज्ञानिक दृष्टीकोन बघता तुळस ही आरोग्यदृष्ट्या महत्त्वाची म्हणून तिची पूजा. दोन तीन पिढ्यांचे सान्निध्य व मुलांवर संस्कार व जिच्यापासून गोरस मिळते तिच्याबद्दल कृतज्ञता असा यात डोळसपणा आहे. चित्पावन ब्राह्मणांना आवडणारे असे हे धार्मिक मनोरंजक सुख समृद्धीचे द्योतक असे मंगलकार्याच आहे.
बोडणाची आरती आरती अन्नपूर्णा । माझी येवूदे करुणा ॥ आरती अन्नपूर्णा नवरात्री नवमीला, थाट बोडणाचा केला, कुवार-सुवासिनी, तुम्हा करिते वंदना ॥ आरती अन्नपूर्णा पायावर दूधपाणी, माझ्या तुळशी अंगणी । धरूनी प्रेमभावा, आता यावे हो सदना ॥ आरती अन्नपूर्णा कोरीव काथोट, आत कणिकेचा पाट, वरती बैसविली, तुझी मूर्ती सुवर्णा ॥ आरती अन्नपूर्णा पाच दिवे पुरणांचे, माझ्या पंचप्राणांचे । ओवाळिते मनोभावे, वरी देते दक्षिणा ॥ आरती अन्नपूर्णा पाच पोळ्या, पाच पानी, वरी दही दूध लोणी । नैवेद्य ताटीचा, तुला करिते अर्पणा ॥ आरती अन्नपूर्णा साडी चोळी जरीकाठी, पाच फळांची ओटी । श्रीफळ मानाचे देते सौभाग्य वाणा ॥ मनोभावे सेवा केली, त्याची प्रचिती आली । राहो कृपा-दृष्टी, अशी माझी प्रार्थना ॥ आरती अन्नपूर्णा